Friday, January 13, 2012

उदयन काळे- आठवणीतील साठवण



उदयन काळे या संगीत रंगभूमिवरच्या उमद्या गायक अभिनेत्याचे ३० डिसेंबरला पुण्यात अचानक निधन झाले. त्याला श्रध्दांजली म्हणून रविवारी..१५ जानेवारीला `संगीत सौभद्र ` या नाटकाचा प्रयोग आयोजित केला आहे.. त्यानिमित्त वाहिलेली ही शब्दांजली....


संगीत रंगभूमीवर पहिली एंट्री `संगीत शाकुंतल` या नाटकात दुष्यंताची घेताना मनात धाकधुक होत होती. तरीही आपल्या आवाजात गायलेल्या पदांनी त्याने रसिकांना मोहवून टाकले. साथीला शकुंतलेच्या भूमिकेत होती..क्षमा वैद्य. भरत नाट्य संशोधन मंदिराच्या त्या रंगभूमीवर नाट्यतपस्वी बाबुराव विजापुरे तालमी घेत. बाबूराव त्या पौराणीक कथानकातला नेमके भाव येण्यासाठी संवाद घटवून घेत. पण पहिल्यांदाच पाऊल टाकलेल्या उदयन काळे यांना त्यासाठी मेहनत घ्यावी लागली. त्याने ती घेतलीही...पुढे तीच मेहनत कामी आली. .अनेक नाटकातून त्यांने विविध संगीत भूमिकांना न्याय दिला.
आज जेव्हा वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी त्याच्या अचानक जाण्याने मन गलबलून उठते. आठवणी येतात त्या त्याच्यासोबत `शांकुतल` नाटकात काम करताना घालविल्या दिवसांच्या.

दिसायला गोरा-गोमटा...गोल चेहरा..कोकणातून आल्याने आवाजात ती कोकणस्थी खास शैली.. त्यातही नाजुकता... पाठांतराला थोडे कष्टही पडत... फारसे गंभीर न होता जेवढे जमेल तेवढे मनापासून करण्याचा त्याचा स्वभाव...मात्र एक नक्की...तो गायला लागला की सुरांशी एकरूप झालेला आवाज..अभिनयाकडे कमी पडल्याचे मग कुणालाच जाणवित नसे..अगदी स्पर्धतही ...नाटकाला प्रथम तर उदयनला वैयक्तिक रोप्यपदक जाहिर झाले. एका त्या शाकुंतल नाटकाने उदयन काळे हे नाव पुण्यतल्या आणि संगीत रंगभूमीच्या क्षेत्रात ओळखू यायला लागले.

तसा हळवा आणि काहीसा लाजरा त्याचा स्वभाव...बोलायलाही मितभाषी आणि मृदु. काही काळ तो बिबवेवाडीतल्या त्याच्या भावाच्या घरी तो रहात...तेव्हा मी जात असे...चंद्रकांत काळे उदयनचा थोरला भाऊ. बेतास-बात शिक्षण घेतल्यामुळे थोडा आत्मविश्वास कमी पडायचा...तरीही त्यांने जिद्द सोडली नाही...संगीतातल्या लयकारी आणि गाणे नटविण्याची त्याची शैली त्याला पुढे अनेक भुमिका मिळविण्यासाठी उपयोगी पडली. काही काळ छोटा गंधर्व आणि नंतर जितेंद्र अभिषेकींकडे संगीताचे शिक्षण त्याने घेतले.

`लावणी भुलली अभंगाला` मधल्या वेगळ्या भूमिकेने त्याला एक वेगळा रसिक मिळाला. यातली `निळोबाची` भूमिका त्यांनी सुमारे दोन हजार प्रयोगांमध्ये केली . जीवनात स्थेर्य आले...मात्र नट म्हणून करीयर घडविण्याचा मनसुबा काही त्याला पूर्ण करता आला नाही.

अखेरीस `आकाशवाणी`च्या दप्तरी `तंबोरा वादक` म्हणून तो चाकरी करु लागला. आणि संगीत नाटकात काम करण्याची संधी मिळत गेली..नव्हे ती त्याच्याकडे चालून आली.. . शिलेदार कुटुंबीयांच्या "मराठी रंगभूमीद्वारे' त्यांनी अनेक नाटकात सहभाग घेतला. . संगीत सौभद्र व स्वयंवरमधील कृष्ण, मानापमानमधील धैर्यधर, मत्सगंधामधील पराशर आणि संशयकल्लोळ मधील अश्वीनशेठ हे काही वानगीदाखल सांगता येईल.

तसा सन्मान आणि कीर्ती फारशी नव्हे अपुरीच मिळाली..मा. दिनानाथ मंगेशकरांच्या नावाने असलेला नाट्य परिषदेचा आणि छोटा गंधर्व यांच्या नावाने कोरेगाव (सातारा) इथला स्वरराज छोटा गंधर्व गुणगौरव पुरस्कार उदयन यांना मिळाला..
ऐन उमदीच्या काळात अचानक त्याचे या जगातून नाहीसे होणे ही सर्वांच्या दृष्टीने धक्कादायक घटना.. त्याच्या जाण्याने संगीत नाटकात रुपाने देखणा आणि पदांना खुलविणारा एक मनमोकळा दिलदार अभिनेता नाहिसा झाला....त्याच्या कुटुंबियांना बळ आणि भविष्यकाळासाठी यथायोग्य शक्ती मिळावी हिच मनोकामना......त्याची स्मृती रसिकांच्या ठायी सदैव रहावी हिच अपेक्षा..




सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Wednesday, January 4, 2012

पुरस्काराचे मोल..अनमोल...

पहिल्या पुरस्काराचे मोल..अनमोल...
गेली ३२ वर्षे मी व्हायोलिन वादक म्हणून विविध कार्यक्रम अनेक संस्थांमधून केले. व्हायोलिनची साथ करताना जो आनंद घेतला तो समोर बसलेल्या श्रोत्यांच्या चेह-यावर मी अनेकविध पध्दतीने अनुभवला. माझे वडिल आणि गुरु पं. भालचंद्र देव यांच्या बरोबर स्वतंत्र व्हायोलिन वादनाच्या अनेक मैफलीही केल्य़ा. काही ठिकाणी मीही स्वतंत्र व्हायोलिन वादनाचा कार्यक्रमही सादर केला. मात्र आज इतक्या वर्षानंतर का होईना पहिला पुरस्कार मिळाला. माझ्यालेखी त्याचे मोल अनमोल आहे.


देशस्थ ऋग्वेदी व्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेतर्फे यंदाचा डॉ. गजानन रमाकांत एकबोटे यांनी ठेवलेल्य़ा ठेवीच्या व्याजातून मिळालेला `संगीत सेवे`साठी पुरस्कार मला जाहिर झाला. तो पुरस्कार ८ जानेवारी २०१२ ला मुक्तांगणच्या पुणे विद्यार्थीगृहाच्या सभागृहात ( अरण्येश्वर रस्ता, पुणे- ९) समारंभपूर्वक देण्यात येणार आहे.


या निमित्ताने माझ्या मनात आलेल्या भावनेला शब्दबध्द करुन मी यातून वाट करुन देत आहे. आपण माझी व्हायोलिनसेवा अनुभवली आहेच..ही शब्दसेवाही गोड मानून मला यापुढच्या वाटचालीस आशिर्वाद द्याल अशी खात्री आहे.

--------------------------------------------------


गेली तीसपेक्षा अधिक वर्षे मी संगीत क्षेत्रात व्हायोलिन वादनाच्या रुपाने आपली सेवा रसिकांसमोर सादर करीत आहे. रसिकांचा भरभरुन प्रतिसाद माझ्या विविध कार्यक्रमांना मिळतो आहे ,
आजही मला आपल्यासारखे दर्दी श्रोते समोर दिसत आहेत.

कलाकार हा रसिकांच्या पावतीचा भुकेला असतो. मूठभर काळजामध्ये ढीगभर स्वप्न बाळगून माणूस जगत असतो आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी अहोरात्र धावत असतो. पण कलाकाराचे मात्र एकच स्वप्न असते. ते म्हणजे आपल्या कष्टाचं कधीतरी चीज व्हावं. ते स्वप्न जेव्हा अशा संस्थांकडून पुरस्काराच्या रुपाने पूर्ण होतं. तो कलाकाराचा खरा आनंद असतो.
आज मला `संगीतसेवा` या नावाने जो पुरस्कार मिळाला आहे, त्याचा खरचं मला खूप आनंद झाला आहे.

कोणताही कलाकार हा आयुष्यभर संगीताची सेवाच करीत असतो. आणि संगीतसेवा म्हणजेच ईश्वरसेवा.
ईश्वरसेवा झाली की आशिर्वाद सतत आपल्या मस्तकी असतो. त्या आशीर्वादाच्या बळावर आणि रसिकांच्या प्रेमावरच
कलावंत यशस्वी होतो. त्याला पुढच्या वाटचालीसाटी बळ मिळते.

असं म्हणतात की, परमेश्वर दर दिवशी एका ठराविक वेळी अमृतकणाची एक ओंजळ पृथ्वीवर टाकतो. ते अमृतकण ज्यांच्या हातावर पडतात ते वादक होतात. ज्यांच्या पायावर पडतात ते नर्तक होतात. ज्यांच्या वाणीवर पडतात ते चांगले किर्तनकार होतात, सूत्रसंचालक होतात आणि ज्यांच्या मनावर पडतात ते असे देशस्थ ऋग्वेदी शिक्षणोत्तॉजक संस्थेसारखे दुस-याचे कौतूक करणारे, पुरस्कार प्रदान करणारे मोठ्या मनाचे लोक असतात.

या पुरस्कारासाठी माझी निवड केलेल्या निवड समितीच्या मंडळींचे आणि संस्थेच्या सा-या पदाधिका-यांची..विशेषतः श्री. शंकर दामोदरे यांची मी आभारी आहे.

माझ्याकडून आयुष्यभर अशीच संगीत सेवा होवो हिच परमेश्वराजवळ प्रार्थना करते.






सौ.चारुशीला गोसावी, पुणे.
charusheelagosavi@gmail.com
9421019499

Saturday, September 10, 2011

काही नविन रचना

रुसलेले शब्द

माझेच शब्द आज मला वाटतात अनोळखी
भावनाही त्यांच्यातल्या ना दाखविती आपुलकी..

शब्दांनाही त्या मी जन्म दिला कवितेसाठी
प्रिय होते, जवळीक त्यांची माझ्यासाठी..

शब्दांची गुंफून फुले मी कितीकदा माळली
गंध घेतला ज्यांनी त्यांना ती आवडली..

भावना कोणतीही असो शब्द मला सापडले
कोणत्याही क्षणी मला ना ते परके वाटले...

आज भावना माझ्या मनात असती
शब्द का न येती भावनेत भिजुनी..

शब्द कधी ना रागावती प्रतिभेची साथ असता
कवितांनाही बहर येतो बाहेर वसंत नसता..

शब्दांवर प्रेम माझे, शब्द माझे सोबती
येतील पुन्हा जरी रुसले माझ्यावरती


श्रीकांत आफळे, पुणे

भेट विठ्ठलाची



विठ्ठलाच्या भेटीसाठी
जीव आसुसला
वारकरी टाळमृदंगाच्या
गजरात पायी हा चालला..
मनी एक आस
विठ्ठल भेटावा
डोळे भरूनी त्याला
एकदा पहावा...
तहानभुक हरते
पायी चालताना
जीवनाचे सार्थक होते
नाव घेताना..
ओठात अभंग
किर्तनी दंग
चालली वारी
कधी पावसाचा संग...
विठू माझा भक्तांसाठी
उभा विटेवरी
नाम गजरात
दुमदुमे ही पंढरी..
चंद्रभागेमध्ये
करुनिया स्नान
विठोबाचे दर्शन
देई समाधान..
भक्तांचा सोहळा
भक्तित न्हाहला
ह्दयाचा विठ्ठल
आनंदुनी गेला...


श्रीकांत आफळे, सी-१--९, गुरुराज सॉसा. पद्मावती, पुणे-४११०३७..फोन- (०२०) ४३६७५३२. मोबा.९८९०३४८८७७

shrikantmaitreya@gmail.com

Friday, September 9, 2011

पेशवाईत गणेश उत्सव


दररोज शिजणारा तीनशे किलो तांदूळ-गहू..., पाच दिवसांच्या उत्सवावर तब्बल ७० हजार रुपये खर्च... अन् मातीसह सोन्याच्या मूर्तीची गणेशस्थापना... अशा श्रीमंती थाटात पेशवाईत गणेश उत्सव साजरा होत असल्याचे पेशवे दफ्तरातील कागदपत्रांवरून सिद्ध झाले आहे. पुण्यातील इतिहास अभ्यासक-संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी शोधलेल्या पेशवाईतील ५० वर्षांच्या जमा-खर्चातून पेशवे गणेशोत्सवातील भव्यता समोर आली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ लोकमान्य टिळकांनी रोवली असली, तरी पेशवाईत शनिवारवाड्यावर गणपती उत्सव मोठ्या थाटा-माटात साजरा केला जायचा. त्या संदर्भात मोडी लिपीत उपलब्ध असलेल्या कागदपत्रांचा अभ्यास बलकवडे यांनी केला आहे. त्यातून उत्सवावर होणारा खर्चच नाही, तर त्याची भव्यताही उजेडात आली आहे.

' शनिवारवाड्याच्या गणेश महालातील सोन्याच्या गणपतीपुढे मातीच्या उत्सवमूर्तीची स्थापना केली जायची. त्यासाठी भव्य मखराची निर्मिती होत असे. पूजा-अर्चा, व्रतवैकल्ये, मंत्रपठण यासारख्या धार्मिक विधींसाठी रात्रंदिवस २१ ब्राह्माणांची नेमणूक केली जात असे. त्याशिवाय, कीर्तनकार, प्रवचनकार, हरदास हेदेखील देवापुढे सेवा सादर करत,' असे बलकवडे यांनी सांगितले.

विविध जाती-धर्माचे देशभरातील नावाजलेले कलावंत सादरीकरणासाठी आवर्जून या उत्सवात सहभागी होत असल्याचेही या कागदांवरून निदर्शनास येते, असेही बलकवडे यांनी स्पष्ट केले.
................

खर्च ७० हजारांहून अधिक

' पाच दिवसांच्या या उत्सव काळात दररोज दोन्ही वेळेस हजारो लोकांना पंचपक्वांन्नांचे भोजन प्रसाद म्हणून दिले जात असे. त्यासाठी दिवसाला तीनशे किलो याप्रमाणे पाच दिवसांत १५ पोती गहू-तांदूळ शिजवला जात असे. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात या पाच दिवसांच्या उत्सवासाठी तब्बल ७० हजार रुपयांहून अधिक खर्च व्हायचा,' अशी त्याची भव्यताही बलकवडे यांनी कथन केली.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9901649.cms

Thursday, August 11, 2011

असंख्य भावा-बहिंणांच्या प्रेमाला ..


राखी बांधणा-या आणि ती निभावणा-या असंख्य भावा-बहिंणांच्या प्रेमाला सादर समर्पण




नाती असतात स्नेह वाढविणा-या असंख्यात रुजणारी

नाती असतात प्रेम करणा-या असंख्याच्या मनात साठणारी

नाती म्हणूनच असतात बळकट

नाती म्हणूनच केवळ नसतात रेशमाचे धागे

धाग्यातली धग असते ती दोन मनांच्या ओसंडून वाहणा-या रक्तामध्येच..

Tuesday, July 19, 2011

रूपांतरीत अनुवादाचा वेगळा प्रकार आवडला



-प्र. के घाणेकर
मला हे पुस्तक खरोखरीच आवडले. रुपांतरीत अनुवादाचा हा वेगळा साहित्य आविष्कार या निमित्ताने अनुभवता आला. त्यातल्या कथा केवळ `बीज` घेतात बाहेरचे पण त्यातला परिसस्पर्श मात्र अस्सल, या मातीतला आहे....
इतिहासाचे अभ्यासक आणि पर्यटन विषयावरचे लेखक प्रा. प्र.के घाणेकर यांचे हे मत आहे
`एका परिसाची कथा` या पुस्तकाविषयीचे....


पुस्तक प्रकाशनाचा अनौपचारिक कार्यक्रम पुण्यात मराठा चेंबरच्या एका सभागृहात झाला. मेहता पब्लिशींग हाऊसने
प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचा सोहळा लेखक मिलिंद जोशी यांनी स्नेहमिलनाचा आनंद म्हणून पुण्यात भरविला.
मिलींद जोशींचे घाणेकर सर हे महाविद्यालयात शिकवायला होते...गुरूने आपल्या एका शिष्याच्या साहित्य कर्तृत्वाचा सन्मानच या निमित्ताने केला. शिष्याने त्यांना पुस्तकाच्या प्रकाशनाला बोलावून गुरूदक्षिणाच दिली.

इतर भाषेतल्या चांगल्या लेखकांच्या चांगल्या गोष्टींचे असे रूपांतरीत साहित्य मराठी वाचकांना आवडेल. मेहता प्रकाशनाने असा साहित्याचा ठेवा या पुस्तकाच्या रूपाने दिला याबद्दल आणि रूपांतरीत साहित्याला तो अनुवाद न ठरवता मराठीतले समर्पक नाव द्यावे अशी अपेक्षा घाणेकरांनी व्यक्त केली.

सारे मोठे लोक बेशिस्त वागतात. चाकोरीतले जीवन सोडून मोकळे-ढाकळे वागायला लागलात तर तुम्हाला नवीन आनंद घेता येईल. साचेबंदपणा तुम्ही सोडत नाहीत तोपर्यत आयुष्याचा वेगळा अनुभव घेता येणार नाही..
मिलिंद जोशी यांनी यावेळी आपले मत व्यक्त करताना सांगितले. लेखकाने तर माणसे, निसर्ग आणि आजुबाजुचे निरिक्षण करणे ही तर अत्यावश्यक गरज आहे. मीही लहानपणी खूप भटकलो. हिंडलो. पश्चिम घाटात, कोकणात निसर्ग पाहिला. कोकणातल्या माणसात त्यांचा बनलो. मनुष्यस्वभावाच्या छटा पाहिल्या.

यातूनच इतर भाषेतल्या साहित्याचा आस्वाद घेतला. त्यांतल्या काही कथा भावल्या त्यातले बीज घेऊन तयार झालेल्या काही कथा अस्सल मराठी वातावरणात लिहल्या. त्यातल्याच २० कथांचे `एका परिसाची कथा` हे पुस्तक तयार झाले.
ते मेहतांनी प्रकाशित केले याचा आनंद मिलिंद जोशींनी व्यक्त केला.
चांगले लेखक आणि चांगले वाचक मिळावेत यासाठी प्रकाशक संस्था नेहमीच अशा लेखकांच्या शोधात असते. मिलिंद जोशी हे असेच लेखक. आम्हाला यापुढेही ते सहकार्य देतील आणि आणखी पुस्तके प्रकाशनासाठी मिळतील अशी आशा सुनिल मेहता यांनी व्यक्त केली.

समारंभात साधेपणा होता. बडेजाव वगळला होता. अनेक वर्षानंतरचे मित्र भेटले. सध्या ते मुंबईत असातात.
तसे जोशी पुण्यातले. नातेवाईक आणि मित्रपरिवाच्या या भेटीने भारावलेल्या मिलिंद जोशींच्या काकांनीही
यात सहभाग घेऊन मिलिंद जोशींच्या आई-वडीलांना साहित्याची आवड होती पण ती आज मुलाच्या पुस्तकाच्या रूपाने प्रत्यक्षात पूर्ण झाली याचा आनंद शब्दातून व्यक्त करून त्यांच्या पुढच्या लेखनासाठी आशिर्वाद दिला.


सुभाष इनामदार, पुणे
mob- 9552596276
subhashinamdar@gmail.com

Sunday, July 3, 2011

अस्सं सासर सुरेख बाई...

महिन्याभरात श्रावण येईल. मुली, महिला आणि नव्याने लग्न झालेल्या नवरीकडे मंगळागौर पूजली जाईल. आणि त्यातल्या भोंडल्यात हे नक्की म्हटले जाईल..
अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडोंनी मारीतं....
ऐकायला या भोंडल्याच्या ओळी चांगल्या वाटतात. भोंडला म्हणणा-या मुली हासून वेळ मारून नेतात.. पण मला मात्र सासरचा अनुभव अतिशय चांगला मिळाला . म्हणूनच तो शब्दात मांडायचा हा प्रयत्न केला आहे.
मुलगी सासरी आली की, ती सतत ताणतणावाखाली. घरातल्या मोठ्या माणसांच्या दबावाखाली . मान खाली घालून वावरत असे..पण मला मात्र सासरी आल्यानंतर माहेरची आठवणही होऊ नये इतके प्रेमळ सासू-सास-यांकडून लाभले. आणि मी सतत अस्सं सासर सुरेख बाई ..म्हणत त्या घरात रममाण झाले. माहेरून व्हायोलिन वादनाच्या कलेचे रोप घेऊन आले आणि सासरी त्याचा वटवृक्षात रुपांतर झाले असे म्हटले तर ते वावगे ठरू नये..
मुलगी सासरी आली की, त्या घरातल्या रीतीभाती समजून घेऊन, घरातल्या माणसांचे स्वभाव ओळखून त्या घराला समजून घेत हळूहळू त्या घरात रुळते. मी माझी कला घेऊन त्या घरात आले. आणि सर्वांना कलाकार सून मिळाली म्हणून खूप आनंद झाला.
तुम्हाला सागते..माझ्या यजमानांनी तर मला दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहूनच पसंत केले. मग काय कलाकार बायको मिळल्याच्या त्यांना केवढा अभिमान. तो आजही आहे. ते तर सतत माझ्या पाठीमागे खंबीर उभे असतात. माझे दीर, जाऊ, नणंदा या सर्वांनाही माझ्या कलेचे काय कौतूक केले . ते सारेच माझ्या कलेला नेहमीच देतात आजही...
आमचे एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्ही सर्वजण एकमेकांना समजावून घेऊन, सर्वांच्या आवडी-निवडी जपून सगळे सण, समारंभ, वाढदिवस खूप छान त-हेने साजरे करतो. सासू-सासरे जुन्या वळणाचे असल्यामुळे सुरवातीला थोडे मतभेद झाले. वादही झडले. पण आम्ही आणि त्यांनी दोघांनीही काही गोष्टींशी तडजोड करून त्यातून सुवर्णमध्य काढून पुढे गेलो. कोणत्याही गोष्टी जास्त विकोपाला जाणार नाहीत याची खबरदादारी घेतली. माझी थोरली जाऊ आणि मी तशा एकाच कार्यालयात . म्हणून का म्हणाना आमचे नाते बहिणीसारखे बनले. टिकले. वाढले. कायम राहिले.
माझा कुठेही कार्यक्रम असला तर ही सारी सासरची माणसे कौतूकाने आवर्जून हजर राहतात. दाद देतात. सारी मदत करतात.
आम्हा दोघी सुनांना सासूबाईंनी मुलाप्रमाणेच वागवले. आमच्यावर त्यांचे खूप प्रेम होते. आमच्या मुलांनाही त्यांनी अतिशय प्रेमाने सांभाळले. त्यामुळेच तर आम्हाला नोकरीसाठी बाहेर पडताना कधीच मुलांची काळजी करावी लागली नाही. मुलांनाही आजी- आजोबांचे प्रेम भरपूर मिळाले. सहवास मिळाला. त्यांच्यावर चांगले संस्कार झाले.
आजकाल ब-याच मुलींना एकत्र कुटुंब नको असते पण एकत्र कुटुंबाचे अनेक फायदे मुलींनी नक्कीच पाहिले पाहेजेत.
अशा माझ्या प्रेमळ हौशी, संगीतप्रेमी सास-यांना नुकतीच ११ जूनला देवाज्ञा झाली..पण त्यांचे आशिर्वाद कायम आमच्या पाठीशी असतील याची खात्री आहे.
असचं सासर सगळ्या मुलींना मिळावे. त्यांनी ते जपावे. वाढवावे. संस्कार हेच धन पुढच्या पुढीपर्यंत द्यावे यासाठी कसोशिने प्रयत्न करावा...
अखेरीस मी म्हणेन...अस्सं सासर सुरेख बाई...सर्वांना मिळावे.....


सौ. चारूशिला गोसावी,
व्हायोलिनवादक, पुणे
मोबा..९४२१०१९२९९
ई.मेल-chrusheelagosavi@gmail.com