Monday, August 26, 2024

रौप्यमहोत्सवी श्रीनिवास संगीत विद्यालय..

श्रीनिवास विष्णुपंत काळे ,माझे वडील..! संगीताची त्यांना प्रचंड आवड ,कोर्टात सर्व्हिस ला त्यामुळे त्यांना स्वतः साठी रियाज करायला वेळ मिळत नसे. रात्री ९ नंतर त्यांना गाणं शिकवायला त्यांचे गुरू पंडित केंडेबुवा येत असत. मग वेळेचं भान नसे गुरूंशिष्यां ना . मी अगदीच लहान होते. वडिलांची केंडेबुवा देत असलेली तालीम ऐकतच झोपत असे आणि यांतूनच मला ही संगीताची आवड निर्माण झाली .पुढे वडील फारच लवकर गेले ,पण जातांना चा प्रत्येक दिवस ते मला सांगायचे ,"मी काय आज असेन उद्या नसेन पण तू गाणं सोडायचं नाही " मी माझी संगीत आराधना करता करता च वडिलांच्या नावाने संगीत विद्यालय सुरू केले. आणि पाहता पाहता या विद्यालयात येणाऱ्या सर्वांच्या सहकार्याने पंचविशीत पदार्पण केले आहे ,याचा खूप आनंद होतो आहे. श्रीनिवास संगीत विद्यालयात शास्त्रीय संगीत ,सुगम संगीत असे शिक्षण दिले जाते. गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेची तयारी करून घेतली जाते.याशिवाय फक्त शास्त्रीय किंवा सुगम संगीत एवढंच मर्यादित शिक्षण न होता प्रत्येकाला सर्व गीतप्रकार आले पाहिजेत हा कटाक्ष मी पाळते. कारण सध्याचं युग हे स्पर्धात्मक जास्त आहे यांत टिकून रहायचे असेल तर तेवढच जागरूक राहणे गरजेचे आहे. यांसाठी मी आमच्या विद्यालयात ""सर्टिफिकेट कोर्स"" सुरू केला. कांही विशिष्ट "राग" आणि "ताल " याबरोबरच सुगम संगीतातील सर्व गितप्रकार म्हणजे अभंग ,नाट्यगीते ,भावगीते ,मराठी ,हिंदी चित्रपट गीते इत्यादी चा समावेश आहे यांशिवाय "गीतरामायण" हा आपला सगळ्यांचा आणि विशेषतः माझ्या वडिलांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणून गीतरामायणातील गीतांचा ही समावेश केला. या उपक्रमाला खूप छान प्रतिसाद मिळाला .यालाही 10 वर्षे झाली.
या विद्यालयातील विद्यार्थी ,विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धा मध्ये भाग घेऊन बक्षिसे मिळविली आहेत ,स्वतंत्र गायनाचे कार्यक्रम सादर करत आहेत याचा मनस्वी आनंद आणि समाधान मिळते आहे । मी दरवर्षी गुरुपौर्णिमा कार्यक्रमात काहीतरी वेगळेपण श्रोत्यांना देण्याचा प्रयत्न करते ।गीतरामायणातील निवडक 30 गीतांचे सादरीकरण 5 तास करून विद्यार्थ्यांनी रसिकांना मनसोक्त आनंद दिला । माझे गुरू जेष्ठ संगीतकार "राम कदम यांच्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम आयोजित करून एका गुरुपौर्णिमेला रामभाऊंना स्वरांजली अर्पण केली .यांत ३५ जणांनी सहभाग घेतला होता. माझ्या वडिलांना शास्त्रीय संगीताची आवड होती आणि आईला ही संगीता बरोबर च कीर्तनाची ही खूप आवड होती म्हणून त्यांच्या नावे " गांधर्व विद्यालयाच्या परीक्षेत ,"श्रीनिवास संगीत विद्यालयातून पहिल्या आणि दुसऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना आईवडिलांच्या नावाने ट्रॉफीज देऊन गौरविण्यात येते. नैसर्गिक आपत्ती काळांत ही विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करून गुरुपौर्णिमा साजरी केली. श्रीनिवास संगीत विद्यालयाचे यू ट्यूब चॅनल सुरू करून कुठे ही विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित झाले नाही. सामाजिक बांधिलकी च्या नात्याने कांही उपक्रम राबविण्यात येतात. बाबा आमटे यांच्या संस्थेला कांही रक्कम देऊन ही पायवाट निर्माण केली. संतश्रेष्ठ शेगांव निवासी श्री गजानन महाराज यांच्या अध्यायावर आधारित गाण्यांचे सादरीकरण शेगांव च्या मंदिरात करण्याचे भाग्य आम्हांला लाभले. श्री क्षेत्र आळंदी येथील मंदिरात ही आमच्या विद्यार्थिनींना भक्तीसुमने अर्पण करण्याची संधी मिळाली.
गेल्या पंचवीस वर्षात अनेक मान्यवरांनी आमच्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमात येऊन आमच्या विद्यार्थ्यांना शाबासकी दिली आणि विद्यालयात चालणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले आहे .यांसाठी पुण्यातील सर्व निष्णात वादकांचे वेळोवेळी सहकार्य लाभले आहे . विद्यालयातील विद्यार्थी ,विद्यार्थिनी स्वतंत्र कार्यक्रम सादर करून जनमानसात स्वतःचे स्थान निर्माण करत आहेत ही "श्रीनिवास संगीत विद्यालयाच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब आहे . जयश्री कुलकर्णी , श्रीनिवास संगीत विद्यालय ,पुणे

Sunday, August 18, 2024

जयवंत दळवी जन्मशताब्दी सोहळा उत्साहात साजरा..!

ज्येष्ठ साहित्यिक ..नाटककार जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने गुरुवार १५ ऑगस्ट रोजी पुण्यात एस एम जोशी सभगृहात बेलवलकर ग्रुप आयोजित आणि डॉ. मानसी मागीकर संकल्पित कार्यक्रम.. दळवी समजून घेताना जयवंत दळवी. जन्मशताब्दी निमित्त पहिला कार्यक्रम पुण्यात झाला. जयवंत दळवी यांच्यावर डॉक्टरेट केलेल्या डॉ. मानसी मागीकर दळवी यांच्याविषयी आपले विचार मांडले.
दळवी यांच्या साहित्यावर आणि त्यांच्याविषयी ज्येष्ठ संपादक पत्रकार विजय कुवळेकर यांनी आपल्या भाषणात दळवी यांच्या साहित्याचा आणि माणूसपणाचा वेध घेतला. ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी..यांच्याशी संवाद साधला तो राजेश दामले यांनी..आणि दळवी यांच्या विषयी आणि त्यानी काम केलेल्या नाटकातील भूमिकांविषयी नीना कुलकर्णी भरभरून बोलल्या.
दळवी याना कोणताही विषय नाटकासाठी वर्ज्य नव्हत्या हे सांगून नाटककार प्रशांत दळवी यांनी त्यांच्या व्यक्तिरेखा हीच कथावस्तू असते हे शिकविले. त्यांनी व्यक्तिरेखा सजीव, बहुरंगी केल्या..मध्यमवर्गीयांच्या दबलेल्या भावनेला दळवी यांनी वाचा दिली असेही ते म्हणाले आणि दळवी यांची राष्ट्रीय पातळीवर त्यांची ओळख निर्माण व्हावी ही अपेक्षाही त्यानी व्यक्त केली.
नाटककार दळवी यांच्याविषयी सारेच मनापासून बोलले.या कार्यक्रमाला रसिकांनी दिलेली भरभरून दाद..
आणि नाटककार जयवंत दळवी यांच्या लग्न, सावित्री,महासागर,पर्याय आणि पुरुष या नाटकातील अमित त्रिभुवन, विनिता पिंपळखरे आणि डॉ. मानसी मागीकर यांनी आपल्या वाचिक अभिनयातून साकार केलेले प्रसंग..याचे दर्शन घडले. समीर बेलवलकर यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन केलेले आपले मनोगत आणि राजेश दामले यांनी कार्यक्रमाची आखणी करण्यात केलेले कौशल्य आणि नीना कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद..यातून नाटककार दळवी पुन्हा एकदा रसिकांच्या मनात कायम लक्षात राहिले..

Tuesday, January 28, 2020

गायन वादनाचा एकत्रित आनंद देणारी मैफल





साज आवाज.. एक धुंद मैफल

शास्त्रीय गायन आणि वादनाचा आनंद देणारी संध्याकाळ पुणेकर रसिकांनी अनुभवली ती जयश्री कुलकर्णी आणि चारुशीला गोसावी या दोन रसिकप्रिय कलावंतांकडून.. आणि ती मैफल आपल्या शब्दातून रंगवीत होत्या विनया देसाई..

रागांच्या बंदिशी. त्यावर रचलेली गीते. कधी मोहरून यावी असे सुगम गीत तर कधी धुंद ऐकत रहावे असे नाट्यपद.. चारुशीला गोसावी यांचा व्हायोलिन वरील मनाला भिडणारा सुरेल आविष्कार. आणि त्यांना गायनातून प्रतिसाद घालणारा जयश्री कुलकर्णी यांचा कमालीचा तयार आवाज.


साज आवाज हे वेगळे नाव घेऊन रंगलेल्या या शुभारंभाच्या कार्यक्रमातील मधुवंती, पटदिप, यमन, चारुकेशी, रागेश्री, मियामल्हार..अशा रागांची कधी व्हायोलिनवरची सुरावट. तर कधी गायनातून रंगत गेलेली बंदिश..

 स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना स्मरून कार्यक्रमातील विविध राग आणि त्यावर आधारलेली गाणी तेवढ्याच मेहनतीने हे दोन कलावंत जेंव्हा तल्लीन होऊन सादर करतात तेंव्हा ती स्वर नादमधुर होऊन रसिकांच्या ह्रदयाचा ठाव घेतो..आज गायन आणि वादनातून पुरेपूर उतरले असे म्हणावेसे वाटते.

कधी गळा डोलवत होता तर कधी व्हायोलीन ताल धरायला लावत होते.
मधुवंतीचे स्वर चारुशीला गोसावी ह्यांच्या व्हायोलिनमधून मनाचा ठाव घेत होते तर गीतरामायणातील निरोप कसला माझा घेता..जेथे राघव तेथे सीता.. ह्या जयश्री कुलकर्णी यांच्या गीताने वेगळीच स्वर ताल आणि रागाची पकड घेतली होती..



 शिवरंजनीतल्या निसर्गराजा.. या गाण्याच्या व्हायोलिन आणि गाण्याच्या अनोख्या जुगलबंदीने रसिकही भाराऊन गेले आणि टाळया बरोबर वन्स मोअर चा नारा बुलंद झाला..अनेक गाणी पुन्हा सादर करावी लागली.
विनया देसाई यांनी केलेल्या निवेदनातून तो फुलत गेला..आणि या कार्यक्रमाची पसंती रसिकांनी तेव्हाच दिली..ह्या वेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमाला परदेशातही पसंत पडेल.. आम्ही तो तिथेही करून साज आवाजला प्रतिसाद दिला..



मराठी ,हिंदी अशा दोन्ही भाषेतील रसिकांना हा मोहिनी घालेल याची खात्री आहे.. मुख्य म्हणजे मर्यादित साथीदारांच्या संगतीने रंगणारा हा कार्यक्रम प्रसन्न बाम ( हार्मोनियम) वसंत देव( तालवाद्ये) आणि अभिजीत जायदे (तबला) यांच्या साथीने हा अधिक भारावून टाकणारा होता..




पुणेकर रसिकांच्या पसंतीला तो उतरण्यासाठी रवींद्र मेघावत याची ध्वनिव्यवस्था तवेढीच कारणीभूत ठरते..
गाण्यांची यादी देण्यापेक्षा तो पुन्हा आपणच अनुभवा असे माझे मत आहे..




- सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com

Tuesday, August 15, 2017

राहून गेलेली गोष्ट - फैय्याज

वयाच्या सोळाव्या वषीर् सोलापूर सोडून मुंबईत आले. सुमती धनवटेलिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दशिर्त 'गीत गायिले आसवांनी' हे माझं पहिलं नाटक. त्यातली माझी मंझरची भूमिका नावाजली गेली. माझ्या गाण्याने रसिक भारावले. नाट्य-समीक्षकांनीही गहिरा स्वरविलास, भरदार आवाज अशा उपाध्या माझ्या आवाजाला दिल्या आणि पहिल्याच नाटकात गायिका अभिनेत्री म्हणून मी नावारूपाला आले. त्यानंतर रंगभूमीवर आलेल्या 'कट्यार काळजात घुसली', 'संत गोरा कुंभार', 'होनाजी बाळा', 'वीज म्हणाली धरतीला' अशा संगीताची पार्श्वभूमी असलेल्या नाटकांनी माझी ही ओळख अधिकच ठळक केली. आजही गायिका अभिनेत्री म्हणून कलारसिक मला नावाजतात आणि ही ओळख मलाही मनोमन सुखावून जाते.

सुखाच्या या हिंदोळ्यावर असतानाच तो झोका पुन्हा सोलापुरात कधी जातो, तेच कळत नाही आणि मग अचानक बारा-तेरा वर्षांची मेळ्यात-कलापथकात काम करणारी मीच मला नव्याने गवसते. गाण्याची-नृत्याची आवड असलेली फैय्याज

माझी ही आवड लक्षात घेऊनच आजीने गाण्यासाठी राम जालिहाळ आणि पंचवाडकरबुवांची तालीम लावलेली; तर नृत्यासाठी मास्टर हसन(कथ्थक) आणि कट्टीबंधुंची(भरतनाट्यम). नृत्य-गायनाचे हे संस्कार होत असतानाच आकाशवाणीवरच्या संगीतसभासारख्या कार्यक्रमांतून बडे गुलामअली खाँ, बेगम अख्तर यांच्यासारख्या महान गायकांची गायकी कानावर पडलेली. मग दिवसच्या दिवस त्याच गायकीत रममाण झालेली फय्याज. कधी तरी या थोर गायकांच्या मैफलींचं सोलापुरात आयोजन झालेलं. पण भरमसाठ तिकिटामुळे बडे गुलामअली खाँच्या मैफलीला मुकलेली फय्याज. मात्र शाळेच्या मदतीसाठी सोलापूरच्या पानगळ हायस्कूल-मध्ये झालेली बेगम अख्तर यांची मैफील दुरून का होईना, ऐकायला मिळालेली आणि त्या जादुभऱ्या सुरांनी कायमची भारावून गेलेली फय्याज. किंबहुना बडे गुलामअली खाँ आणि बेगम अख्तर यांच्या गायकीमुळे उत्तर हिंदुस्थानी गायकीचा ध्यास घेतलेली फय्याज. परिणामी ही गायकी कधी तरी शिकता येईल का असा सवाल बारा-तेराच्या वयात स्वत:लाच करणारी फय्याज...

... आणि अचानक अशी संधी मला गवसली. पहिल्याच नाटकाने गायिका अभिनेत्री अशी माझी ओळख झाली. त्यामुळे नंतर तशाच भूमिका मिळत गेल्या. अर्थात यामुळे पं. वसंतराव देशपांडे, पं. जितेंद अभिषेकी यांच्याशी परिचय झाला आणि मला त्यांच्याकडून गायनाचे धडे मिळू लागले. परंतु या साऱ्यांनाच मला बेगम अख्तर यांच्या गाण्याचं असलेलं प्रेम ठाऊक होतं. त्यामुळेच एकदा अभिषेकीबुवा सत्येंदभाई त्रिवेदी या आपल्या संगीतातील ददीर् मित्राला म्हणाले-'कभी बेगमजी बम्बई में आयेगी, तो इस लडकीकी उनसे पहेचान करा देना.'

त्रिवेदीजी म्हणजे गायक-वादकांच्या घरी हक्काचा राबता असलेली अफलातून व्यक्ती. मग त्या निर्मलादेवी असोत किंवा मेनकाबाई शिरोडकर असोत. साऱ्यांशी त्यांची सलगीची जान-पहेचान. आणि एक दिवस त्रिवेदीजी खरोखरच आले आणि मला म्हणाले-'चलो अख्तरीबाईजी आयी है.'

त्यांच्या त्या बोलण्यानेच छातीत धडधडायला लागलं. ज्यांचं सतत ध्यान केलं, त्यांना भेटायचं म्हटल्यावर मात्र माझ्या अंगावर काटा आला. मी चुपचाप त्रिवेदींबरोबर चालायला सुरुवात केली. बेगम अख्तर मुंबईत आल्या की कायम मरिन लाईन्सवरच्या सी ग्रीन साऊथ हॉटेलात उतरत असत. आम्ही त्या हॉटेलवर गेलो. त्रिवेदीजींनी खालून फोन लावला आणि अख्तरीबाईंना म्हणाले-'मी फय्याजला घेऊन आलोय. तिला तुम्हाला भेटायचंय.'

' तिला तुम्हाला भेटायचंय' ऐकून बाई गडबडल्या. कारण आमच्यात फय्याज हे नाव मुलाचं असतं. म्हणून अख्तरीबाईंनी त्रिवेदीजींना विचारलं, 'तुम्ही कुणा मुलाला घेऊन आला आहात का?' पण मग त्रिवेदीजी म्हणाले,'नही, ये फय्याज लडकी ही है' आणि आम्ही वर सहाव्या मजल्यावर अख्तरीबाईंच्या रुमवर गेलो. बाईंनी मला वरून खालपर्र्यंत बारीक नजरेने न्याहाळलं. म्हणाल्या - 'कुछ सुनाओगी?' आणि साथीला स्वत:च पेटी घेऊन बसल्यादेखील!

माझ्या पोटात खड्डा पडला. मनात आलं, 'आजवर ज्यांच्या गझल-ठुमरीची पारायणं केली, त्यांना काय ऐकवायचं?' मग धीर करून त्यांचीच एक गझल म्हटली. गझल संपली. क्षण-दोन क्षण मधे गेले असतील नसतील, बाईंचे खणखणीत शब्द कानावर पडले- 'त्रिवेदीजी क्या गजब गाया लडकीने. खुदाने क्या नियामत दी है!'

त्यानंतर मग बेगम अख्तरांशी गुरू-शिष्याचं नातं जुळलं ते कायमचं. त्यावेळी 'कट्यार काळजात घुसली'चे प्रयोग जोरात सुरू होते. म्हणून मी बेगमजींना प्रयोग बघायला येण्याचं निमंत्रण दिलं. त्यांनीही ते मनापासून स्वीकारलं आणि एक दिवस आल्या 'कट्यार...' पाहायला. तिथे प्रयोगाआधीच त्यांची आणि पं. वसंतराव देशपांडेंशी भेट झाली. ते एकमेकांना आधीपासूनच चांगले ओळखत होते. वसंतरावांनी आवाज देऊन मला जवळ बोलावलं. माझ्याकडे बोट दाखवत बेगमजींना म्हणाले, 'ये तुम्हे और तुम्हारे गायकी को बहोत चाहती है. इसे कुछ सिखाओ.' यावर बेगमजींनी आनंदाने मान डोलावली आणि त्या 'कट्यार...'चा प्रयोग बघायला बसल्या.

' कट्यारचा...' पहिला अंक पावणेदोन तासाचा असायचा. बाईंना तर थोड्या थोड्या वेळाने सिगारेट ओढायची सवय. पण बाई निमूट पावणेदोन तास बसून होत्या. अंक संपल्यावर वसंतराव त्यांना भेटायला खाली गेले. तर म्हणाल्या, 'पहले दो कश मारके आती हू. बादमें बातें करते है.' आणि शिवाजी मंदिरच्या बाहेर जाऊन (तेव्हा शिवाजी मंदिर खुलं होतं) दोनच मिनिटात त्या परत आल्या. मग नाटकाबद्दल पंडितजींच्या-माझ्या गाण्याबद्दल भरभरून बोलल्या. माझ्या 'लागी करेजवाँ कट््यार' गाण्याने तर बेगमजींच्या डोळ्यात पाणी तरळलं. 'कट्यार' बेगजींना एवढं आवडलं की नंतर त्यांनी ते सात-आठ वेळा पाहिलं.

या भेटींमध्ये मी बेगमजींच्या खूप जवळ गेले. 'कट्यार...'नंतरची माझी 'वीज म्हणाली धरतीला', 'होनाजी बाळा' अशी बहुतेक संगीत नाटलं बेगमजींनी पाहिली. मुख्य म्हणजे नंतर जेव्हा जेव्हा त्या कार्यक्रमांसाठी किंवा आकाशवाणीवर रेकॉडिर्र्ंगसाठी मुंबईला येत, तेव्हा हक्काने मला बोलावून घेत. त्यांच्याबरोबर मागे तंबोरा घेऊन साथीला बसवत. एवढंंच नाही, तर अनेकदा एखादी सुरावट मुद्दाम मध्येच सोडून देत आणि ती मला उचलायला सांगत.

एकप्रकारे माझं हे त्यांच्याकडे चाललेलं संगीतशिक्षणच होतं. ऊर्दू शब्द नजाकतीने कसे उच्चारायचे, त्यांची फेक कशी करायची, आवाजाचा लगाव... असं बरंच काही त्यांच्या मागे बसूनच मी शिकले. अशा त्यांच्या अनेक जाहीर-खाजगी मैफलीत मी त्यांना साथ केलीय. त्यांच्या या मैफली ऐकायला तेव्हा संगीतकार जयदेव, मदनमोहन, नगिर्स अशी बडीबडी मंडळी यायची. त्यांच्यासमोर गाताना अख्तरीबाई देहभान हरपून गझल-ठुमरी गायच्या आणि ते माझ्या पथ्यावरच पडायचं. मी जेवढं आत्मसात करता येईल तेेवढं करायचे. अर्थात हे सारं एकलव्य वृत्तीने चाललेलं असायचं.

... त्यांच्याबरोबरच्या कार्यक्रमांचा असा सिलसिला सुरू असतानाच एक दिवस मी धीर करून त्यांना म्हणाले, 'बेगमजी मुझे आपके पास गाना सिखना है.'

क्षणाचाही विलंब न लावता त्या म्हणाल्या, 'जरूर, क्यों नही? मेरी बेटी बनो और गाना सिखने के लिये लखनौ आ जाओ.'

... पण मला त्यांची बेटी नाही बनता आलं, लखनौला नाही जाता आलं. माझ्या मागे तीन भावंडं होती. त्यांची जबाबदारी माझ्यावर होती. दोन बहिणींची लग्नं करायची होती, भावाचं शिक्षण करायचं होतं. तसंच नाही म्हटलं तरी गायिका-अभिनेत्री म्हणून काहीएक कारकीर्द मागीर् लागली होती. ते सारं इथे सोडून लखनौला जाणं परिस्थितीमुळे शक्य नव्हतं. वसंतराव, अभिषेकीबुवा सारेच जा-जा सांगत होते. पण नाही जाता आलं, एवढं खरं!

तेव्हा वय विशी-बाविशीचंच होतं. जाऊन पाच वर्षं शिकून आले असते, तरी आजच्या फय्याजची कारकीर्द काही वेगळीच घडली असती. कारकीर्दही एकवेळ बाजूला ठेवू. संधी असतानाही मला बेगम अख्तर यांच्याकडे रीतसर गाणं शिकता आलं नाही, याचीच खंत आहे आणि ती आजन्म राहील.

दूर देशी गेला बाबा

‘हॅलो सर, मी बर्लिनहून बोलतोय! सर मी २८ वर्षांचा आहे आणि माझे आई-वडील ठाण्यात असतात. बाबा म्हणतायेत तू शिक अजून. ते कर्ज काढतायेत, पण मला वाटतंय आता बस्स! मी पीएच.डी. झालोय..’ नावसुद्धा न सांगता हा मुलगा ऊर फोडून बोलत होता. माझ्या तोंडून फक्त.. हं.. हं..! ‘मी परत ठाण्याला चाललोय, बाबांना सांगणार आहे, तुम्ही रिटायर व्हा! माझे बाबा खरंच दमलेत हो.. गेले काही दिवस मी खूप दिवस अस्वस्थ होतो, पण काय करावं सुचत नव्हतं. इंटरनेटवर ‘दमलेला बाबा’ गाणं ऐकलं आणि परतीचं तिकीट काढलं.’ आता माझ्या तोंडून ‘हं.. हं’ सुद्धा जात नव्हतं, इतका सुन्न झालो मी. एक उच्चशिक्षित तरुण इतका हळवा होऊन छोटय़ा मुलासारखा रडत होता.. बाऽऽऽऽप रे! हे काय आहे? दाद ? चांगल्या गाण्याला प्रतिसाद़़? की रसिकता़़़, हळवेपणा, खरेपणा.. खूप विचार केला आणि उत्तर सापडलं ते एवढंच, की ‘याला म्हणतात नातं.

‘दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई..
नीज दाटली डोळ्यांत.. तरी घरी कुणी नाही..’

हे आमचं गाणं ऐकून एक भगिनी रंगात येऊन रसग्रहण करीत होत्या- ‘आजचे आई-बाबा स्वत:मध्येच इतके व्यस्त असतात की, मुलांसाठी वेळ आहे कोणाला? आजची मुलं फार एकटी झाली आहेत. त्यांची व्यथा.. वगैरे वगैरे.. त्या कौतुक करत होत्या. पण ते ऐकताना डोक्यात इतका कल्लोळ झाला की, वाटलं, आम्ही नाही हो इतके वाईट, नाही हो इतके स्वार्थी.. हतबल आहोत आम्ही! ..डोळ्यासमोरून एखादा चित्रपट जावा तसे मी पाहिलेले सगळे व्यग्र ‘बाबा’ सरकत होते..

खूप आधी ठरवूनसुद्धा आयत्या वेळेला बॉसनी महत्त्वाचं काम लावलं, म्हणून मुलाच्या गॅदरिंगला जाऊ न शकलेला ‘बाबा..’, त्याच गॅदरिंगमधलं मुलाचं गाणं फोनवरून ऐकून गाडीत एकटाच टाळ्या वाजविणारा ‘बाबा’, परदेशातून येताना मुलीने फर्माईश केलेली बार्बी डॉल घेऊन वाढदिवसाच्या दिवशी पोहोचण्याचा आटापिटा करताना विमान रद्द झाले, म्हणून रात्री उशिरा पोहोचल्यावर मुलीच्या उशाशी बाहुली ठेवून झोपलेल्या त्या मुलीकडे पाहत आपले अश्रू इतरांपासून लपवणारा ‘बाबा..’, नाटकाच्या दौऱ्यावर असताना दर चार तासांनी आपल्या बायकोला फोन करून सहा महिन्याच्या बाळाच्या कानाला फोन लावायला सांगून ‘हॅलो हॅलो. मी बाऽबा’ म्हणत आपला सहवास देऊ पाहणारा अस्वस्थ ‘बाबा’, घरापासून दूर सहा-सहा महिने बोटीवर, युद्धभूमीवर राहणारा आणि पत्रातून, फोनमधून ‘माझी आठवण काढतात ना मुलं? मी आठवतो ना त्यांना? अशा प्रश्नांना बायकोच्या ‘हो..’ या उत्तरासाठी आसुसलेला ‘बाबा’.. इथपासून ते मुलीचं लग्न ठरल्यापासून रोज ‘बोलता बोलता ठसका लागला म्हणून डोळ्यात पाणी आलं, बाकी काही नाही..’ असं म्हणणारा ‘बाबा’!
बाळाकडे पाहून वेडा होऊन नाचणारा ‘बाबा’, ऑफिसमध्ये अतिशय कडक असलेला, पण घरी शाळा-शाळा खेळताना मुलीच्या हातचा धपाटा आनंदाने खाणारा ‘बाबा’, रात्री उशिरा घरी आल्यावर मुलांच्या केसातून हात फिरवत एकटाच बोलणारा ‘बाबा’, मुलांबरोबर फटाके उडवताना पुन्हा एकदा लहान होणारा ‘बाबा’, कामानिमित्त घरापासून दूर राहूनही दर रविवारी काही तासांसाठी धडपडत घरी येऊन मुलांना डोळे भरून बघणारा बाबा, शिकायला परदेशात गेलेल्या मुलीशी वेब-कॅमवर गप्पा मारताना ‘तू बारीक का वाटतेस गं? तिकडे खूप त्रास होतोय का?’ म्हणत ‘नाही तर सरळ परत ये भारतात’ असं सुचवणारा बाबा..

या सगळ्या बाबांची ‘हाक’, त्यांची धडपड, करिअर, पैसा हे सारे सांभाळत मुलांबरोबर वेळ घालविण्यासाठी ते करीत असलेला आटापिटा- हे सगळं सांगावसं वाटलं!
अशा प्रत्येक पुरुषाला ही बोच असते. जेव्हा मित्र एकत्र जमतात, तेव्हा एकमेकांना खूप मनापासून सांगतात की, ‘थोडा आराम कर, मुलांबरोबर मजा कर’ कळतं, पण साधायचं कधी? कसं? ते कळत नाही. या गर्दीत धावताना आपलं जगणं कुठे आपल्या हातात राह्यलंय?

माझा मुलगा मला जसं म्हणाला की, खूप गमती आहेत माझ्याकडे, आता नको पैसे, तू घरी थांब.’ ..कुठे थांबायचं हे मुलं सुचवतात, पण आपल्यालाच समजत नाही. धावत राहतो आपण. आणि मनात ही भीतीही बाळगतो की, उद्या मुलं मोठी झाल्यावर गरज असेल त्यांना आपली?

अस्वस्थ मनानं हे सगळं संदीप खरेशी बोललो. त्याचं आणि माझं नातं म्हणजे -

न सांगता तू मला उमगते सारे
कळतात तुलाही मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बंध
कळ्यांचा चाले कळ्यांशी संवाद.

असं आहे. त्यालाही हे सारे असंच, इतकंच तीव्रतेने वाटत होतं आणि त्याच्यातला हळव्या मनापासून कविता लिहिली. माझ्या अस्वस्थ अवस्थेतच चाल तयार झाली होती. दु:खापेक्षाही उद्विग्नता, फ्रस्ट्रेशन मांडणारी ही चाल आणि ते शब्द यांतून हे गाणं रसिकांच्या मनात खूप खोलवर रूजलं.
प्रत्येक ठिकाणी वेगळे किस्से, वेगळ्या प्रतिक्रिया.. कार्यक्रमात छोटी-छोटी मुलं-मुली आपल्या बाबांना रडताना पाहून सुन्न झाली. कोणी ‘माझ्या बाबाला का रडवलंस’ म्हणून आमच्यावर चिडली. सासरी गेलेल्या मुलींनी ‘बाबा गाणं ऐकलंत?' म्हणत फोन केले. सगळ्यांच्या प्रतिक्रिया तुटक्या, हळव्या आणि दुखऱ्या..

हे गाणं मुलांनी बाबांसाठी ऐकलं आणि बाबांनी मुलांसाठी, आणि बाबांच्या बाबांसाठीही. हे गाणं जितकं बाबाचं, तितकंच ते आजच्या नोकरी-व्यवसाय करणाऱ्या आईचंसुद्धा..

प्रत्येक ठिकाणी गाण्यावर वेगळे किस्से, वेगळी प्रतिक्रिया.. सगळ्या तितक्याच हळव्या, दुखऱ्या.. (इथे वाढू शकतं!!)
आम्हीही घरापासून दूर-दूर पुन: पुन्हा हे गाणं गातो आणि जखम रोज भळभळते. रोज ठरवितो की, या महिन्यात थोडं नीट नियोजन करायचं. मुलांबरोबर करायच्या अनेक गोष्टी घोळतात, पण बघता बघता हा महिना सरकतो.. मग स्वत:लाच पुढच्या महिन्याचं वचन.. हे चुकतंय, ते समजतं, पटतं. जे ठरवतो, ते हातून घडत नाही, यासारखी दुसरी बोच नाही. थोडं थांबायला हवंय. वेग कमी करायला हवाय..

पण निदान हे जमेपर्यंत तरी स्वत:ला टोचून टोचून रोज गायलाच हवं..

‘असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो?
लवकर जातो आणि उशिरानं येतो..
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला..’
http://www.youtube.com/watch?v=8FqwOZ7_TOM



-डॉ. सलील कुलकर्णी

वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर

महाराष्ट्रातील नामवंत तमाशा कलावंत स्वत:ला 'मास्टर` म्हणून संबोधतात. याच परंपरेतले एक वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर. चंद्रकांत ढवळपुरीकर हे देखील स्वत:ला मास्टर म्हणवून घेत. त्यांना राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त झाला होता. वगसम्राट आणि खलनायक म्हणून परिचित असलेले ढवळपुरीकर आज आपल्यात नाहीत, पण एक कर्तबगार तमाशा कलावंत म्हणून त्यांनी आपला स्वतंत्र ठसा तमाशा सृष्टीत निर्माण केला होता.

1932 साली ढवळपुरीकर ता. पारनेर जिल्हा अहमदनगर येथे जन्मलेले चंद्रकातजी केवळ तिसरी इयत्ता शिकले. पण अनेक वगातील भूमिका त्यांना तोंडपाठ असत. 1943 साली देवीदासबुवा राधेकर यांच्या तमाशात ते नाचकाम करीत. विष्णुबुवा बांगर बेव्हेकरसह देवीदासबुवा राधेकर अशा फडात ते काम करीत असत.

आचाऱ्याच्या हाताखाली राहून बिगारी काम करणाऱ्या चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी पायात चाळ बांधून, केस वाढवून नाच्याचे काम सुरू केले. 1955 सालापासून ते सहनायकांच्या भूमिका करू लागले. पुढे चंद्रकांत ढवळपुरीकर आणि दत्ता महाडीक पुणेकर या जोडीने अनेक वर्षे महाराष्ट्राचे रंजन केले. भिल्लांची टोळी, महाराष्ट्र झुकत नाही, लग्ना आधी कुकू पुसले, असे पुढारी ठार करा, शत्रुशी झुंजला बांगला, ज्ञानेश्वर माझी माऊली, इंदिरामठाचे गुपीत, महाराष्ट्र तू जागा राहा अशा अनेक वगनाटयांमध्ये चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी गायक, खलनायकाचे काम केले.


प्रा.डॉ.प्रकाश खांडगे


Monday, July 31, 2017

संगीतातून साहित्याचे आदानप्रदान होऊन त्यातून कलाकृती बाहेर येते





कीर्ती शिलेदार यांचे अनुभवातून आलेले काव्यविषयक विचारदर्शन

मल्हार कवीता..या कार्यक्रमाची सुरवात रविवारी  पुण्यात साहित्या परिषदेच्या सभागृहात कीर्ती शिलेदार यांच्या सन्मानाने झाली.. रंगत संगतचे प्रमोद आडकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांच्या जेष्ठ भगिनी दिप्ती किरण भोगलेही व्यासपीठावर होत्या..
तेव्हा रंगत संगत प्रतिष्ठानच्या वतीने केलेल्या सन्मानाचा मान राखत त्यांनी संगीत नाटक आणि पदांचे महत्व..यातून काव्य आणि साहित्य यांच्या आदानप्रदानातूनच उत्तम संगीत नाटक वा साहित्य बाहेर येते ते आपल्या मनोगतातून बोलून दाखविले..

संगीत नटालाही नायकातील पदांचा अर्थ उमजून मग त्यावर अभिनय करायचा असतो..नाटकातील रचना ही गेयच असावी लागते..आणि त्यातून अभिनयही करता यावा लागतो..

खाडीलकराच्या रचना थोड्या अवघड पण अर्थाने समऋध् होत्या आजही नाच्यसंगीतात खाडीलकरांच्या पदांची निवड केली जाते..असे सारे कीर्ती शिलेदार आपल्या विचारात स्पष्ट करतात..

त्याचा हा सारांश..



मी संगीत नाटकात काम करताना लक्षात येते की संगीत नाटकात जेवढे महत्व गद्याला आहे तेवढेच महत्व पदालाही  आहे..संगीत नाटकातली रचना ही गेय असावी लागते.. शब्दांचा अभ्यास करणे ही संगीत नटाची पहिली जबाबदारी असते.

संगीत नाटकात किर्लेास्कर मंडळींपासून हिच शिस्त नटांना आहे की काव्याचा भावार्थ आधी समजून घ्या मग नंतर  त्यावर तुम्हाला अभिनय करता येईल. त्यामुळे पदांचा अर्थ कळाल्याशिवाय गायचे नाही हा दंडक नाना आईंनी किर्लोस्कर मंडळींपासून पाळला..तिच शिकवण आमच्या पिढीपर्य़त आली.

आम्ही कवींनी केलेल्या कवीतांपासून जरासे लांब असू पण नाटकामध्ये नाटककारांनी केलेल्या कवीतेशी आमचा खूप जवळचा संबंध आहे. आमच्याकडे राम गणेश गडकरींसारखे काव्यप्रभू होते.  देवल आहेत, किर्लास्कर आहेत, खाडीलकर आहेत. बाळ कोल्हटकरांसारखा कवी, लेखक मराठी रंगभूमीवर आले्ला आहे.  कवीवर्य रा. ना. पवार, चिं.त्र्य़ं. खानोलकर, गंगाधर महांबरे हे सारे आमच्याकडे राहिलेले आहेत..त्यामुळे शब्दांची साधना हे लाकं किती करतात. हे आम्ही तै अगदी जवळून अनुभवलेले आहे.

खानोलकरांचे अनुभव तर फारच  ग्रेट. निळकंठबुवा अभ्यंकर आणि खानोलकर यांच्या चर्चा व्हायच्या त्यातला क्षणन क्षण कानात साठवून ठेवला आहे. आमचे बुवा शब्द गेय हवा यावर ठाम असत.. खानोलकर एकही शब्द इकडचा तिकडे करायला तयार नसत. येतो येतो सजणा..सवतीचा वास तुझ्या वसना.. हि त्यांची शब्दरचना होती..बुवा म्हणाले वास म्हटल्यावर हे जरा विचित्र वाटते. हा शब्द बदला ना कवीराज.. बुवा म्हणाले. खानोलकर म्हणाले गंध चालेल..चालेल म्हटल्यावर ते पद झाले..येतो रे येतो सजणा..  सवतीचा गंध तुझ्या वसना..असे पद कायम झाले. नांदिच्या पदातला  कळा हा शब्द बदलालया मात्र खानोलकरांनी ठाम नकार दिला.. त्यांच्या मते.. कला सादर होत असताना नटाला आसंख्य कळा अनुभवाव्या लागतात तेव्हा तुमची कला पोहोचते. अशा चर्चेतून  आमचे जीवन समृध्द होऊन गेले..अभोगी नाटकाच्या तालमीमुळे.. अभोगी नाटकाने यश जरी दिले नसेल पण आमचे जीवन अगदी संपन्न केलेले आहे.
 संगीतातून साहित्याचे आदानप्रदान होणे आणि त्यातून कलाकृती बाहेर येते हे फार महत्वाचे आहे.
 मीही एक लहानपणा कवीता करण्याचा प्रयत्न केला होता..बालवय आणि बालबुध्दी याच्यारलीकडजे त्याला काही अर्थ नव्हता. महांबरे कवीता लिहीतात मीही कवीता लिहिते..अशातून ती चूक घडली.


नवे संगीत नाटक करताना शब्द बदलण्याचे धाडस कधी केले..म्हणून मी किंचीत कवी असू शकेन.. शाळेत आमच्या कवीच्या जाणीवा समृध्द देल्या त्या  विमलाताई गरवारेतल्या वा. भा. जोशी सरांनी. बालकवी आणि केशवसूत यांच्यावर शाळेत त्यांनी एक कार्क्रम शाळेत केला होता. त्यात मी . लता सहभागी झालो. त्यामुळे केशवसुतांचे काव्य अतिशय प्रिय झाले. अजुनही त्या सुंदर कार्यक्रमाची आठवण माझ्या मनामध्ये  तशीच्या तशी कोरली गेलेली आहे.















मल्हार शब्द असेलेले नामदेवांचे काव्य त्यांनी शेवटी गाऊन दाखविले..





-सुभाष इनामदार, पुणे
 subhashinamdar@gmail.com
9552596276