Thursday, June 30, 2011

नवा गडी नवे राज्य



काळाची पावले ओळखून अभिनयाने जिवंत केलेले नाटक

काळ बदलला. तरूण वर्ग स्वतंत्र झाला. मुली स्वतःच्या मताने निर्णय घेऊ लागल्या. घर आपले...राजा-राणीचे हवे. दोघेही नोकरी करणारे. पैसा बक्कळ.. कपड्यात बदल झाला. सारे कसे मोकळे-ढाकळे आले. जमाना इंटरनेट, लॅपटॉपचा आला. घरात स्वयंपाकापेक्षा बाहेरून पार्सल मागविले की झाले... घराची सजावट बदलली ..तरी घराला भिंती हव्यातच. प्रायव्हसी म्हणतात ती. लग्ना आधीचे सारे लग्नानंतर चालत नाही. पतीला मैत्रीण चालते ..पण पत्नीला मित्र असणे हे बरे नव्हे.... ते न शोभणारे....
सांगायचे तात्पर्य....हे गडी नवे पण राज्य तेच जुने... पण नव्या कोंदणात सजविलेले.... तसे सांगायचे म्हणजे संशयकल्लोळ हो...
नवा गडी नवे राज्य....ह्या नाटकाने आपला शतकमहोत्सवही साजरा केलाय. उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्या भुमिकांनी नाटकाला जिवंतपणा येतो... खरं म्हटले तर हे आजच्या काळाचे नाटक आहे.. जुनी पल्लेदार वाक्य नाहीत. स्वगते नाहीत. एकाच वेळी बराच काळ चालणारे प्रसंग नाहीत. वाक्यांना मराठी भाषेची पारंपारिक चौकट नाही..नवे शब्द आहेत. वाक्यांची गरज फक्त सांगण्यापुरती त्याला भाषेची झालर हवी कशाला?
एकूणच मालिकांमध्ये जसे तुकड्यांनी घटना पुढे जाच रहातात तसेच काहीसे छोटे प्रसंग. कांही बेडरूम प्रसंग. तसे बोल्ड. पण नाटकाला आवश्यक. आणि स्पष्ट सांगायचे झाले तर या नाटकाने तरूणाईचा वर्ग रंगमंदिराकडे खेचला गेला आहे. नाटकाला बुकींग चांगले होते. आणि दुसरे म्हणजे उमेश कामत, प्रिया बापट यांचा इस्टंट अभिनय पहायला मिळतो. दोघांचेही चेहरे बोलतात. भावना दिसतात. त्याला प्रेमाचा स्पर्श होतो. नाते अधिक फुलून येते.
एकदंत क्रिएशन्सने रंगमंचावर आणलेले नाटक समीर विध्वंस यांनी ज्या नेमक्या रितीने ते दिग्दर्शित केले आहे. नाटकाला गती दिली. गेयता आणली. प्रसंगाला सतत हलते ठेवले. कलावंतांना पुरेसे मोकळे सोडले. आणि परिणामकारक प्रयोग सादर करण्यात ते यशस्वी झालेत.
क्षितीज पटवर्धन यांनी हृषीकेश (उमेश कामत) आणि अमृता( प्रिया बापट) ह्या नवीन लग्न झालेल्या तरूण जोडप्यात उद्भभवलेल्या संसारातली ही मित्र कहाणी लिहली आहे ती संवादात कागदावर उतरवली आहे..क्षितीज पटवर्धन यांनी. चटकदार संवाद. त्याक्षणी चपखल वाटतील अशी वाक्ये. अधुनिक जोडप्यांना काळजात नेमकी घुसतील अशी शब्दरचना...यामुळे नाटक तुमच्यासमोर खिदळत रहाते.
पुरूषवर्गाला प्राधान्यक्रम देणारी आणि शेवटी ही सारी संशयाची धार शुल्लक करणारी ही घटनाक्रमाने सांगणारी काहीशी नाटकी कृत्रिमता नाटकाला सिनंमातल्या पटकथेचे रूप देते. एकमेकांना लग्नापूर्वीपासून ओळखणारे हे आधिचे प्रेमिक जेव्हा पती-पत्नी बनतात..तेव्हा पहिले काही दिवस सोडले तर संशयवाढविणारे जातात. अमृताचा मित्र हिम्मतराव जेव्हापासून घरी येतो..तेव्हापासून त्या दोघांची मैत्री तशीच खुल्ली..तीच खटकचे...नाटकाला तीथेच सुरवात होते. संशयाने सारा खेळ..पालटतो. वातावरण गंङीर बनत जाते...आणि शेवटी हे सारे संशयाचे बळी ठरतात..हे सिध्द झाल्यावर सुखांताने शेवट होतो.
त्यातच पुरूषाची जुनी मेत्रीण घरी आल्यावर तिने केलेले दावे ऐकल्यावर संसारातील दोघांनीही संयम सोडल्याचे नाटकलेखक दाखवितो. पुरूषी अहंकाराला सांभाळताना स्त्रीच्या दुख-या मनालाही तो फुंकर घालतो. कहाणी रंगवताना त्याला भावनेचा तात्पुरता मुलामा दिल्यासारखे वाटते. इथे हे नाटक काही सांगते म्हणून पहायाला जावू नका... ते तुमची करमणूक फुल्ल टाईमपास करणारे आहे... जुनाच विशय नवीन बाटतील भरून पुन्हा ताज्या दमाच्या कलाकारांकडून तुमच्यापर्यत आणलाय एवढेच.
मोकळेपणानी वावरणारी ही पात्रे तुम्हाला खुशीत ठेवतात. भावनेला हात घालून प्रसंगी तुमच्या डोळ्यात पाणीही आणतील... पण हे कसब आहे ते कलावंताचे. उमेश कामत, प्रिया बापट यांची जोडी रंगभुमिवर नवे राज्य गाजविणार हे सांगण्यासारखी मस्त दिसतात.. छान दिसतात. मोकळी वावरतात. त्यांच्या अबिनयात सहजपणा आहे. संवादात विलक्षण साधेपणा आहे. सफाई आहे. चेह-यावर बोलके भाव आहेत. टटका लावणारी मुद्रभिनयाची ताकद दोघांकडेहगी आई. म्हणूनच तेच या नाटकाचे खरे आकर्षण आहे.
हेमंत ढोणेंचा हिम्मतराव विलक्षण वेगळा..ग्रामिण मातीचा गंध घेऊन आलेला. रसरशीत , तरतरीत आणि गंमत सहजपणे कशी करावी ते सांगणारा वठलाय.त्यामानाने प्राजक्ता दातार थोड्या डाव्या वाटतात. त्याकेवळ भूमिका करतात.. त्या अंगावर येत नाहीत.
प्रसाद वालावरकारांच्या नेपथ्यातून आजचे मुंबईतले श्रीमंती घर , त्यातले महागडे रुप..सारेच दिसते. भासते. रंगसंगती उत्तम आहे. जसे पडद्यावर साकारणे गीत कथेला पूरक असते तसे ऋषीकेश कामेरकरांचे संगीत आणि त्यांनी तयार केलेले गीत नाटकाला मोहकता देते.
शितल तळपदे यांची पूरक प्रकाश योजना प्रसंगाना अदिक उठाव देते.
चंद्रकांत लोहकरे यांनी निर्मित केलेल्या या नाटकाने अजच्या काळाला पटेल. रुचेल आणि आवडेल असे नाटक देऊन नाटक हलकेफुलके आणि योग्य विषयावरचे आणले तर ते पेक्षक नक्कीच आपले मानतात याचे दर्शन घडविले आहे...



सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
subhashinamdar@gmail.com

Wednesday, June 15, 2011

विजय मागिकर साठीत



सांस्कृतिक क्षेत्राचा वाटाड्या
आमचा सांस्कृतिक क्षेत्रात वावरणारा...कलावंताचा चाहता असणारा..
स्वरानंदात कार्यकुशलतेने कार्यरत असलेला विजय मागिकर साठीचा झाला..
त्यानिमित्ताने त्याच्या खासगी आयुष्यासह
त्याच्या कलाजिवनाचा घेतलेला हा धावता आढावा...




प्रिय विजय,
परवा विनयाचा फोन आला तेव्हा जाणवले....तू साठीचा झालास.
आपण पीडीएत भेटलो. अभिनय येतो असा समज होता. पण भालबा केळकरांच्या दुस-या फळीत रमलो.
पडद्यामागचे कलावंत झालो. पडेल ते काम करून नाटक किंवा प्रसंग नाट्य दर्शनात
कधीतरी नगण्य भूमिकेत वावरलो. पण यामुळे व्याक्तिमत्व विकासाचा पाया घातला गेला.
नट म्हणून कधीतरी दिसू.. एखादी तरी छोटी भूमिका मिळेल अशी आशा बाळगून तीन-चार वर्ष पीडीएत रमलो.
चर्चा ऐकत गेलो. कानावर पडेल ते साठवत राहिलो. यातून एक नक्की झाले.
आपण नाटकाच्या पडद्याआडचे वारकरी. कधी ज्योती मेंहेंदळे..तर कधी राणी पारसनीस, तर कधी चंद्रकांत दिघे,
अजित सातभाई, दिलिप वेंगुर्लेकर यांच्या तालमी पहात गेलो. नट म्हणजे काय... त्या भूमिकेत वावरणे...
कसे ते पहात गेलो.. त्यातच रमत गेलो.
यातूनच निराशेचे..अपयशाचे ढग पदरी पडत गेले... सोबत राहिलो.
आज काहीतरी नवे शिकायला मिळेल या जिद्दीने डेक्कनवरच्या महिलाश्रमाच्या तळघरात त्यानाटकाच्या...
भालबांच्या सहवासात दिवस कसे गेले कळालेही नाही.
मात्र एक झाले. तुझी मैत्री मिळाली. एकटाच कॉट बेसिसवर रहात असल्याने तुझ्या रेव्हेन्यू कॉलिनतल्या घराने
आयुष्यातले आनंदाचे क्षण दिले. नाना आणि आईंचा प्रेमाचा सहवास मिळाला. पुण्यातला एकटेपणा नाहीसा झाला.
पुढे विनयासारखी सखी तुझ्या आयुष्याच्या संसारात दाखल झाली. आणि तुमचे घर अधिक परिचयाचे झाले.
अर्थात याला तुझी प्रेमळ विचारपूस... मैत्रीची घट्ट विण... आणि मोठ्या भावासारखा दिलासा...सारेच मिळाले....

तुझ्या संसारावर वरूणरुपी नवे पर्व दाखल झाले. घराला घरपण झाले. नानांचे आणि आईंच्या मायेची सोबत लाभली.
तुझ्या घरच्या मोकळ्या वातावरणातून मैत्रीचा धागा जुळत गेला...गुंफत गेला... मने मोकळी झाली.
विजय मागीकर हे नाव पुढे माझ्या आयुष्यात कायमचे जोडले गेले.

विजय,
शिक्षणाच्या फारशा फंदात न पडता तुझ्या तरतरीत स्वभावाने आणि हजरजबाबीपणाने गरवारे कंपनीत
आबासाहेब गरवारेंचा पी ए म्हणून तु नोकरी पटकावलीस.
चार-पाच वर्षे ती केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचे मनी घेतलेस.
लिक्विड साबणाचा पुरवठा करण्याचे नवे तंत्र आत्मसात केलेस. रेव्हेन्यू कॉलनीतल्या घरात मागच्या बाजूला
शेडमध्ये हा व्यवसाय दमदारपणे चालविलास. थोडिथोडकी नव्हे तर तीस-बत्तीस वर्षें.
मात्र तसे तुझे घर पाहिले की याला नोकरी-व्यवसाय करायची काय गरज असा प्रश्न मला नेहमीच पडे.
आजही घरात विद्यार्थ्य़ींसाठी खोल्या भाड्य़ाने देऊन तुझे छान चाललेय. मात्र स्वतःच्या जागेचा प्रश्न .
भाडकरूंच्या कटकटी . कोर्टाचे खेटे. यातून घर अगदी स्वतःचे बनविलेस.
आताही तुझ्या घराची ओढ लागावी अशी ती वास्तू आम्हा मित्रांना सारखी खुणावते आहे.

दिवसाचे काम संपले की तु कलेच्या प्रांतात रमलास . दिग्दनर्शनाच्या आवडीतून शापीत आणि
पुढचे पाऊल मध्ये तेही साध्य केलेस. शापितच्या वेळी तूझे असिस्टंट डायरेक्टरपद तुझी चित्रपटाबाबतची जाणीव
जागृत करून नवीन क्षेत्रात पुढचे पाऊल पडले. राजदत्तांच्या मार्गदर्शनाचा लाभ गोट्या या सिरियलमुळे तुला झाला.
पुढचे पाऊल मध्ये मानसीनेही (विनया) छान काम केले. यातून चित्रपट माध्यमात स्थायिक झाल्यसारखे वाटले.
हिंदीतही पद्मनाभ यांच्यासारख्या दिग्दर्शकाच्या हाताखाली शिकण्याचा योग तुला आला.
खरे तर तू त्यातच करियर करायचा..पण नाही. तुझी भूक कलेची आणि कलावंतांच्या सहवासाचा अधिक होती.

विजय, तुझ्यामुळे विनय नेवाळकर (शापित), राजदत्त (दत्ता मायाळू), संजय ऊपाध्ये, श्रीकांत पारगावकर,
विठ्ठल वाघ, हिमांशू कुलकर्णी, भास्कर कुलकर्णी, गोविंदराव बेडेकर, ...असे कितीतरी माझ्या परिचयाचे झाले.
राजन-साजन मिश्रांसारख्या बुजुर्ग गायकांनाही तुझा सहवास हवासा वाटतो.. ते मी पाहिले आहे..यापेक्षा काय हवे?
तुझ्या ओळखींतून पुण्याचे सांस्कृतिक क्षेत्र जवळून अनुभवता आले. जाणीव वाढली. संगीत, साहित्य, नृत्य,
आणि चित्रपट क्षेत्रात तुझा दबदबा हेवा वाटण्यासारखा वाढत राहिला.

मला आठवते पं. भिमसेन जोशींना भारतरत्न जाहिर झाला. तेव्हा तू मला त्यांच्या पहिल्या पत्नीची मुले राघवेंद्र
आणि आनंद ..जी दोघेही पुण्यात धायरीत रहातात..त्यांची संगीत क्षेत्राला माहिती व्हावी म्हणून
ई-सकाळच्या माझ्या कार्यालयात आलास. आपण राघवेंद्र आणि आनंदयांच्यावर व्हिडीओ स्टोरी केली..
पुढे स्वरानंदच्या कार्यकारीणीला तुझ्या सारखा नवा कार्यकर्ता मिळाला. आमच्या सारख्या परिचितांना तुझी हक्काची साथ मिळाली.

तुला साद घातली की सारी गोष्ट पूर्ण होणार याची खात्री कित्येक मित्रांना आजही आहे.
म्हणून तर तुला तर बरोबर घेऊन जातात.. आजही...
तुही तेवढाच दिलदार पैशाच्या विचार न करता मित्रत्वाचे सारे बंध एकवटून तू मदतीचा हात देतोस.
केव्हाही बोलवा..विजय येणार याची खात्री असते . अगदी पुलंच्या नारायणा सारखा.
आज पुण्याच्या कलाक्षेत्रात तुझा दबदबा आहे. कार्यक्रमाची व्यवस्थापनाची काटेकोर बांधणी करणारा सूत्रधार
तुझ्या रूपात मिळाला आहे. श्रीधर फडकेंपासून मंजूषा कुलकर्णींपर्यत सारेच कलावंत तुझे बनले.
नव्हे तुझ्या स्वभावाने ते आपलेसे बनविलेस. मायग्रेनचा त्रास सोसूनही तू बेंगलोर, हुबळी, धारवाड, कुठेही गेलास. अगदी प्रसंगी मारही खाल्लास...पण ते कुणाला कळूही न देता हे व्रत कायम ठेवलेस...
नेटाने सांस्कृतिक क्षेत्राचा वाटाड्या बनलास.. नवख्या कलावंतांचा मार्गदर्शक झालास......ध्यास एकच...
चांगली मंडळी उत्तम कार्यक्रम करणा-यांना आधार ,मदत करणे .
थोडक्यात म्हणजे....

तुझे मी पण हरविले गेले
नेमके करायचे ते राहूनच गेले
इतरांसाठी आयुष्य वेचताना
स्वतःसाठी जगणे राहूनच गेले

विजय, आता तु साठीत आलास. स्थिर राहून आनंद घे. तुझ्या मार्गदर्शनातून इतरांना उभारी दे. स्वतःसाठी..
कुंटुंबासाठी वेळ दे. वरूणला समजावून घे. मानसीच्या मनाचा तळ शोधण्याचा प्रयत्न कर.
निवारा मिळालाय. आता कालानंद घे.
आतातरी तुला हवे तसे...स्वानंदी वागत रहा... बंधनांची नको करू तमा..
आनंद तर देशीलच.. पण स्वतःतला कलावंत ...संघटक, कुशल मार्गदर्शक बाहेर येवू देत..
तुझ्यात बरेच कांही आहे. बोलण्याचे भान आहे. सांगण्याचे तंत्र आहे. व्यवस्थापनातला मंत्र तुझ्यात आहे.
कलावंतांची फळी तुझ्यामागे उभी आहे. तु नवनिर्मितीचा भार उचल. सांस्कृतिक क्षेत्राला स्वतःचे भान दे.

तुझ्या साठीच्या प्रवासाचा पस्तीस वर्षाचा साक्षीदार असलेला,
तुझाच,

सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
Email- subhashinamdar@gmail.com