Monday, August 10, 2015

आजही सुधीर फडके यांची महती कायम..

मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे युगकर्ते ..राष्ट्रभक्त..शास्त्रीय संगीताचे जाणकार..मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या संगीताने सुवर्णाचे पान निर्माण करणारे संगीतकार..ज्येष्ठ गायक..गीतरामायण भावपूर्णतेने आणि तन्मयतेने सादर करणारे थोर गायक..सुधीर फडके  .. उर्फ बाबुजी...त्यांची एकलव्याप्रमाणे भक्ती करून त्यांच्या गायकीचे टप्पे आपल्यापरिने रसिकांच्या मनात रुजविणारे त्यांच्या संगीताचे अभ्यासक आणि एके काळी बाबुजींच्या गाण्यानी चैत्रबन मंतरून टाकणारे गायक श्रीपाद उब्रेंकर यांनी ९ ऑगस्टला पुण्यात एस एम जोशी रंगमंचावर पुन्हा एकदा संगीतकार सुधीर फडके यांच्या चित्रफितीतून आणि त्यांच्या गाण्यांच्या पुनश्च दर्शनाने श्रोत्यांना तीन तास खिळवून ठेवले.. हा त्यांचा कार्यक्रम कदाचित पंचवीसावा तरी असावा..
गुरूंचे स्मरण करून त्यांच्यातल्या गुणांना आणि व्यक्तित्वाला मनोभावे वंदन करण्यासाटी श्रीपाद उब्रेंकर यांनी स्मरण बाबुजींचे केवळ ध्वनिचित्रफितीतूनच नव्हे तर दोन तयारीच्या गायकांकडून म्हणजे पुण्याचे राजेश दातार आणि कोल्हापूरच्या..डॉ. भाग्यश्री मुळे ...( ज्यांनी सुधीर फडके यांचे सुगम संगीतातील योगदान या विषयावर पीएच डी करून एस एन डी ची विद्यापिठाची डॉक्चरेट मिळविली)..यांच्याकडून काही गाण्याचे प्रत्यक्ष सादरीकरण करुन संगीतकार सुधीर फडके यांच्या अविट गीतांचे गायन एकविले.
सर्वात्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी आर्थिक मदत केली आणि तो सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिला..पुणेकर रसिकांना म्हणून तर सुन्हा सुधीर फडके यांच्या संगीताची मोहिनी अनुभवयाला मिळाली..

आपल्या गायकीच्या सुरेल स्वरातून जेव्हा भाग्यश्री मुळे या सुखांनो या...या गीतांच्या आरंभीची आलापी करतात..तेव्हाच आजचा कार्यक्रम रंगणार हे नक्की होते...पुढे राजेश दातार स्वर आले दुरुनी..आणि प्रथम तुज पाहता..या दोन गाण्याची फर्माईश सादर करतात..तेव्हा तर रसिक पुन्हा एकदाचा ( वन्स मोअर) नारा देऊन..मुंबईचा जावई चित्रपटातील रामदास कामत यांच्या गायकीला अजुनही किती छान दाद देतात  ते कळते.. त्यातच उपेंद्र भट यांनी रामदास कामत यांना दोन डिग्री ताप असूनही बाबुजींनी हे गाणे कसे रकॉर्ड केले त्याची कहाणी एकविली.


बैठकिची लावणी..काहो धरिला मजवरी राग...तेवढ्यात ठसक्यात आणि लयदार पध्दतीने भाग्यश्री मुळे य़ांनी सादर केले..तर नविन आज चंद्रमा..हे युगलगीतही दोघांनी गायले.. झाला महार पंढरीनाथ..हा प्रासादिक अभंग.आणि गीतरामायणातील..तोडीता फुले ही...माणिक वर्मांचे गीत गायले भाग्यश्री मुळे यांनी..आणि अखेरीस देशभक्तिने ओतप्रोत रसरसलेले साने गुरुजी यांचे बलसागर भारत होवो..राजेश दातार जेव्हा भावपूर्ण आणि जोशपूर्ण म्हणतात..तेव्हा रसिक तन्मय होऊन..त्यांच्या सूरात आपला सूर मिसळून एकतानता घडवू आणतात..
मिलिंद गुणे आणि अभिजीत जायदे तसेच प्रसाद जोशी यांच्या हार्मोनियम, तबला आणि तालवाद्याच्या साथीशिवाय गाण्याला रंगत आलीच नसती..हे ही नमूद करणे उचित आहे..

पूर्वाधाचा हा तास श्रीपाद उब्रंकरांनी आपल्या पुणेरी..स्पष्टतेच्या फटक्यांनी घेतला..त्यात आजचे गाय़क पुरेसे तालिम करुन गाणी गात नाहीत..वगैरे शेरे मारून घेतले. सुधीर फडके एक व्यक्ति..एक कलाकार आणि श्रेष्ट संगीतकार म्हणून किती थोर होते..ते आजच्या पिढीला कळावे यासाठी हा ध्यास घेऊन कार्यक्रम सादर केल्याचे ते सांगतात..तेव्हा रसिक त्यांच्याही परिश्रमातून सादर झालेल्या कार्यक्रमाला टाळ्यांनी दाद देतात..
उत्तरार्धात जेव्हा बाबुजी ध्वनिचित्रफितीतून ऐकता येतात..तेव्हा त्यांच्या बॉडिलॅंग्वेज मधून त्यांच्या सहजी पण भावपूर्ण गायकीचे पुरेपुर दर्शन घडत रहाते..
एका क्षणी हिदी चित्रपटसृष्टीत काही मोजक्या चित्रपटांना संगीत देणारे बाबुजी मराठीत पुन्हा आले..ते बरे झाले..म्हणून तर मराठी चित्रपट सृष्टीला सुवर्णकाळ लाभला...गीतरामायण..सिध्द झाले....श्रीपाद आपल्या ओघवत्या निवेदनात सांगत होते..
पुलंच्या घरी पं. कुमार गंधर्व यांना काही गाणी ऐकविल्यानंतर ते म्हणाले ..तुम्ही गाता चांगले..पण त्यात आत्मा नाही...मग इंदूरच्या आपल्या गणेशोत्साव आपले गाणे घरी ठेऊन जेव्हा ते मिठी मारून फडके यांच्या गाण्यावर खूष होऊन..आपल्या शिष्यांना सांगतात..की गाण्यात आत्मा कसा असतो..ते पहायचे असेल तर सुधीर फडके  यांचे गाणे ऐका..हे सांगतात..तेव्हा कलावंतांची एकमेकांवर असणारी श्रध्दा आणि भक्ति यांचे पुरेपूर दर्शन होऊन...ते ऐकताना आपलेही डोळे पाणावतात..

पावणेदोन तासांच्या ध्वनिचित्रफितीचा हा कार्यक्रम इतका श्रवणीय आणि पाहण्याजोगा आहे...की असे कलावंत मराठीत निर्माण झाले  यांचा सार्थ अभिमान वाटल्याशिवाय रहात नाही..तो पुन्हा पुन्हा पाहावा यासाठी उब्रेंकरांनी तो सादर करावा यासाठी रसिक आणि तमाम मराठी लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतील यात शंका नाही..
बाबुजींचे सारे पैलू पाहण्यासाठी जी श्रीपाद उब्रेंकर यांनी जी एकलव्याच्या भक्तिने जी मेहनत घेतली त्याला सालाम करावासा वाटतो..



- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, August 3, 2015

संगीत नाटकांच्या अभ्यासाठी पुण्यात केंद्र होण्याची गरज

संगीत नाटके आता लुप्त होत आहेत..पण अशा कार्यक्रमातून त्या दीडशे वर्षांच्या परंपरेला पुन्हा रसिकांसमोर सादर केले जात असून.. त्याला प्रतिसादही उत्तम मिळत आहे..संगीत नाटक ही आपल्या मराठी रंगभूमीची खाक देणगी आहे. ती नाटके पुन्हा पहायला रसिकांना आवडते..ती नाटके जतन करुन त्यांचा अभ्यास व्हायला हवा..संगीत नाटकांचा अभ्यास करण्यासाटी पुण्यात त्याचे केंद्र निर्माण होण्याची गरज आहे..तशी मी विनंतीही मी मुख्यमंत्र्याकडे करणार आहे..संगीत अभ्यासक आणि शास्त्रीय संगीताचे गायक पं. विकास कशाळकर यांनी यावेळी बोलत  होते.


ख्यातकिर्त गायक  डॉ. वसंतराव देशपांडे यांची ३२ वी पुण्यतिथी, नटसम्राट बालगंधर्व यांची ४८ वी पुण्यतिथी, तसेच नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिशताब्दीचे निमित्त साधून डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे  संगीत संशयकल्लोळ चा कथामय नाट्याविष्कार पुण्यात रविवारी साजरा झाला. पद्मश्री तालयोगी सुरेश तळवलकरयांच्या हस्ते , डॉ. विकास कशाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संशयक्ल्लोळ नाटकातील पदे सुचेता अवचट, किशोरी जानोरकर, ऋषिकेश बडवे, हेमंत पेंडसे यांनी सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. त्यांना पं. जयराम पोतदार- हार्मोनियम आणि नीलेश रणदिवे -तबला यांनी  साथसंगत केली. 
 अशोक अवचट आणि अनुराधा राजहंस यांनी नटी सूत्रधाराच्या वेषात संशयकल्लोळ नाटकाचते कथानक सांगत त्यातल्या पदांना सुरवात करून दिली. संगीत नाटकांची केवळ आठवण यातून होते..त्यातली पदे मैफलीच्या स्वरूपात इथे सादर होतात..इतकेच..

नाट्यसंगीतातून शास्त्रीय संगीत हे सूक्ष्मपणे झिरपत आले आहे. शास्त्रीय संगीताचेच एक रूप असणाऱ्या नाट्यसंगीताने रसिकांची ज्ञानसंपदा वृद्धिंगत करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी गेल्या अनेक वर्षांत पार पाडली आहे. ते आपण जपायला हवे असे मतही पं. सुरेश तळवलकर यांनी या प्रसंगी रसिकांसमोर व्यक्त केले.


Saturday, August 1, 2015

सुवर्णकांती लाभलेला गजलकार- रमण रणदिवे



जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे
जगणार्‍याने जगता जगता मजेत गावे गाणे

आयुष्याच्या वेलीवरती भावफुले बहरावी
ती वेचाया अलगद खाली नक्षत्रे उतरावी
नक्षत्रांच्या श्वासांतुनही पेरित जावे गाणे

पाऊस-पाणी-प्रकाश-वारा-पक्षी-सागर-सरिता
परमेशाच्या प्राणांमधल्या जिवंत सार्‍या कविता
आनंदाने मिळेल त्याचे कवेत घ्यावे गाणे

जगण्याचे बळ उदंड देते गाणे प्रत्येकाला
इथे न कोणी अमर अखेरी जाणे प्रत्येकाला
जाता जाता दुनियेसाठी उधळून जावे गाणे



मराठी गजल क्षेत्रात आपल्या गजलेचा ठसा मराठी मनावर उमटविणारा गजलकार रमण रणदिवे..

आपल्या कारकीर्दीची पन्नाशी त्यांनी साजरी केली तेही माजी गृहमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते काव्यजीवन पुरस्कार स्विकारून..

हे भाग्य लाभले ते या मनासारखी कवीता अजुनही लिहता आली नाही हे नम्रपण सांगणारा ..मातीवर पक्के पाय ठेऊन..समाजात आनंदाबरोबर दुःखाचे क्षण टिपणारा.....रमण रणदिवे ....या गजलकाराच्या दृष्टीने.
कलावंताला चार प्रकारे आपले कलाजीवन फुलवावे लागते ..हे सांगताना..रियाज, साधना, सिध्दी आणि सर्वात शेवटी येते..ति प्रसिध्दी....असा तो प्रवास डोळसपणे सांगणारा मोठ्या मनाचा माणूस शोधणारा..माणसात देव शोधणारा कवी..रमण रणदिवे..
शनिवारी सकाळी ११ वाजता रंगत-संगत आणि श्यामची आई प्रतिष्ठानच्यावतीने सुशिलकुमारजींच्या हस्ते रमण रणदिवे यांना काव्य जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला...
यावेळी त्यांनी वडील..जे कवी होते..दुसरे सुरेश भट आणि तिसरे  सुरेशचंद्र नाडकर्णी..या तीन गुरुंची आठवण रसिकांना करुन दिली..

जगाला झालेल्या जखमा आपल्या मनावर वागविणारा  आणि समाजाला सावधगिरीचा इशारा आपल्या शब्दातून देणारा..हा कवी असतो..हे त्यांना आवर्जुन ठामपणे सांगितले..

आशय घेऊन सांगणारा कवी म्हणून सुशिलकुमारांनी आपल्या सोलापूरच्या या कवीचे कौतूक केले..
यावेळी शर्वरी जेमिनिस यांनी रणदिवे यांच्या काही कविता सादर करुन त्यांच्या प्रतिभेची साक्ष पटवून दिली..
पद्मश्री पं. सुरेश तळवलकांनीही या कवीचा सन्मान अपल्या अभ्य़ासू भाषणातून केला.

अगदी वेगळ्या वेळी सकाळ असूनही पुण्याच्या  महाराष्ट्र साहित्य  परिषदेच्या सभागृहातील दर्दी आणि रसिकप्रिय धुरंदरांची गर्दी सारे काही सांगून जाते..

- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276