Friday, February 25, 2011

थरारेल वीट



स्वरभास्करा
नादपुत्रा
तळपत्या भास्करासम
ताप सोसताहेत
लोक
तप्त मनास शीतल करणारा
तुझा स्वर
नि, पोळलेल्यांना
स्वरानंद देणारा !
धुवांधार मर्दानी मल्हार स्वरांनी
कोमेजलेली मने
प्रफुल्लीत करणारा !
तुझा एक सच्चा
स्वर
दुभंगलेल्यांचा
अभंग
विठ्ठल
आसवांचे सांत्वन करणारा
वैश्विक जाणीवांना जोडणारा
रात्रीच्या धुंद सवाई गंधर्व
मैफिलीत
तुझे स्वर चांदणे होऊन बरसत
-- कधी कोसळती धारा
कधी प्रसन्न शिडकावा
कधी कधी करुणाही झरे !
मैफिल तुझी : मंत्रमुग्ध तल्लीनता
ब्रह्मानंदी टाळी !
मानवी संवेदनांना टोकदार करणारा
शब्दांना रडवणारा
शब्दांना खेळवणारा
शब्दांची दमछाक करणारा
करुण - आर्त - स्वर - भास्कर
सुंदर ते वेचून
सुंदर ते करून
पिढ्यानपिढ्या गारूड करणारा
संतवाणीच्या भक्तीस्वरांनी
शास्त्रीय संगीत ज्ञान
घरा-दारात, तळागाळात नेणारा
ममताळू
सीमा तरी कुठे होत्या
तुझ्या स्वरांना ?
स्वरांच्या लहरी
विविध लहरी
विश्व लहरी
मानवी ऐक्य
वैश्विक ऐक्य
साधणारा
अजूनी आपल्यातच........
आनंदयात्रीची स्वरयात्रा.......
अखंडित.......
ज्ञानियांच्या राजानंतर
संगीताच्या राजाची
समाधी लागली आहे !
टिपेच्या दाणेदार तानांची
मैफिल सजवीत आहेत
शांतता राखा.....
हळू बोला......
---- थरारेल वीट !



Suresh Tilekar
Pune
Ph.: 020-26330615

Tuesday, February 22, 2011

नाटकातील प्रायोगिकता - महेश एलकुंचवार


आमची प्रायोगिकता अधिकधिक अनुदार व संकुचित तर होवू लागली नाही? प्रायोगिकतेचा एक आम्हाला पटणारा कोश आमच्या भोवती विणून त्यातच आम्ही मग्न राहीलो, असे तर झाली नाही? आम्ही करतो तेच खरे (व म्हणून दुसरे करतात ते रद्दबातल), असा गंड तर आम्हा प्रायोगिकांमध्ये निर्माण झाला नाही? परिणामी आमच्या प्रायोगिकतेलाच कोती व अल्पजीवी तर केले नाही?

मुळात प्रायोगिकता म्हणजे परंपरेविरुद्ध बंडखोरी असे समीकरण आहे. पण जिच्याविरुद्ध बंड करायचे ती परंपरा आधी समजून घ्यावी लागते. येथे मी परंपरा हा शब्द फक्त नाट्यपरंपरा एवढ्याच मर्यादित अर्थाने वापरत नसून जीवनाच्या सर्व अंगांमधली परंपरा, एका संपूर्ण जीवनशैलीची परंपरा एवढ्या व्यापक अर्थाने वापरत आहे. ते बंड अखेर जीवनामधल्या कुठल्य तरी अस्विकारणीय असलेल्या परंपरेविरुद्ध्च असते; कारण नाट्यपरंपरा ही अखेर त्या जीवनशैलीशी जुळलेली असते, किंबहुना तिच्यामधून उमलू आलेली असते. ही सर्व परंपरा समजून घ्यायची तर खूप अभ्यास हवा व पूर्वग्रहरहित, डोळस व्रुत्ती हवी. कुठल्याही देशातली नाट्यपरंपरा किंवा तीविरुद्धची बंडे ही काही निर्वात, निर्जन्तूक पोकळीत फुलत फळत नाहीत. त्या बंडखोरीमागे काही तात्विक विचार असावा लागतो व हा विचार नेहमीच जगण्याबद्दलच्या मूलभूत प्रश्नांमधून जन्मलेला असतो.

आपल्या नाटकामधली बंडखोरी जीवनविषयक तत्त्वचिंतनातून निर्माण झालेली आहे असे दिसत नाही. आपले बंड उपलब्ध शैलीविरुद्ध फक्त असते व ते एका निर्वात पोकळीत क्षण्काल घोंगावत राहाते. अश्या त-हेचे बंड वा प्रायोगिकता क्षणार्ध आपल्याला दिपवून टाकू शकते हे खरे, पण बहुदा ती काही काळ पेटल्यासारखी उजळते व स्वत:शीच जळून राख होते. परंपरा आपण सगळीच्या सगळी स्विकारत नसतो; कारण ती आपला चेहरा नित्य बदलते, बदलत्या काळाबरोबर नवे रूप घेते. हे असे होते कारण डोळस माणसे परंपरेतले कालबाह्य आहे ते वर्ज्य करून तिचे फक्त सत्त्व अंगी लावून घेतात. परंपरेचे सत्त्व व आधुनिकतेचा बळ ह्यांचा काही मेळ घालता आला, तर प्रायोगिकतेला एकाग्र व निश्चित दिशा मिळू शकते.

परंपरेचे भान असणे ह्याचा अर्थ एतद्देशीय असणे नव्हे. आपली परंपरा इतक्या संमिश्र विविध प्रभावाने घडत गेलीय की एतद्देशीय नकी काय ते ठरविता येणे कठीण आहे. आणि आता जागतिकीकरणाच्या रेट्यात, फक्त भारतीय परंपरांचा विचार करण्याऐवजी जागतिक परंपराअ समोरे जाण्याचा खुलेपणा व उमदेपणा दाखविता आला तर्च आपला सर्जनपिंड पुष्ट होत जाईल. जागतिक प्रभावांना व परंपराना आपण प्रतिरोध करतो, तो आपल्यात आत्मविश्वास कमी पडतो म्हणून तर नाही?



महेश एलकुंचवार

आख्यायिका बासरीच्या


बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात.
पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात.
त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी 'मी' येतो.... याच 'मी'पणाच्या अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे.
कृष्णाचं आवडतं वाद्य बासरी. एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या, आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला वावरतो, पण तो आम्हाला साधा भावही देत नाही.
तू तर एवढी साधी; ना रूप ना काही. पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो.
तू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर? बासरी हसली आणि म्हणाली, 'तुम्ही माझ्यासारख्या व्हा, मग कृष्ण तुम्हालाही जवळ घेईल.'

अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं. बासरी पुढे म्हणाली, 'मी अगदी सरळ आहे; ना एखादी गाठ, ना एखादं वळण. मी पोकळ आहे. त्या पोकळीतून माझ्यातला अहंकार गळून पडलाय.

माझ्या अंगावरच्या सहा भोकांतून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकले आहेत.
मला स्वत:चा आवाजही नाही.. माझ्या सख्यानं फुंकर मारली तरच मी बोलते.
तो जशी फुंकर मारतो तशी मी बोलते.' गोपी निरुत्तर झाल्या.
तेव्हापासून त्या बासरीवर रुसून आहेत.

म्हणूनच असेल कदाचित, पण आज आपल्याकडे एकही स्त्री बासरीवादक नाही………..!

मयूर मुकुंद आपटे

Tuesday, February 15, 2011

आदरांजली स्वरभास्कराला





भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या मैफलीच्या रणांगणावर तंबोरा घेउन कित्येक वर्ष साथ करणारे दोन स्वरसाधक माधव गुडी आणि राजेंद्र दिक्षित ( राठोड) यांनी आपल्या गुरूंना आदरांजली वाहण्यासाठी १० फेब्रुवारीला टिळक स्मारक मंदीरात स्वरांजली सभेत गाऊन त्या स्वरांचे स्मरण केले. एक वेगळा प्रत्यय त्यांनी रसिकांना दिलाच पण गुरून दिलेले स्वरांचे देणे आपण किती तंतोतंत साध्य केले आहे याचे दर्शन घडविले.

रथसप्तमीचा दिवस म्हणजे पंडीतचींचा वाढदिवस असायचा. आज ते आपल्यात नाहीत पण त्यांची अभंगवाणी आणि ते सूर आजही मनात साठले आहेत. या निमित्ताने त्या सुरांना या दोन शिष्यांनी मोकळी वाट करून दिली. अत्यंत सुरेल आणि सुंदर मैफलीला रसिकांना प्रतिसाद इतका मिळाला की टिळकची बाल्कनीही ब-याच दिवसांनी उघडली गेली. आणि टाळ्यांच्या गजरात रसिक दाद देत होता.

दोन्ही शिष्यांच्या अभंगवाणीच्या गायकीतून पंडीतजींचा सहीसही प्रत्यय उत्तरोत्तर रंगत गेला. इंद्रायणी काठी, मन राम रंगी रंगले, तिर्थ विठ्टल यासारखे अभंगवाणीने अजरामर केलेले अभंग राजेंद्र दिक्षित आणि माधव गुडी यांनी आळवून त्या दिव्य स्वरसमूहांचा आनंद वाढविला.

पंडितजींचे ज्येष्ठ पुत्र राघवेंद्र जोशी, आमदार गिरीश बापट, उल्हासदादा पवार, संदीप खर्डेकर यांनी कार्यक्रमासाठी हजेरी लावून कलावंतांच्या कलेला पर्यायाने पंडीतजींच्या गाण्यालाच आजरांजली वाहिली. प्रत्येक अभंगानंतर समर्पक अशी आठवण आणि पंडीतजींच्या मोठेपणाचा भाग रंगवत नेऊन मंगेश वाघमारे यांनी अभंगवाणी रसरशित होण्याला मदत केली.

आदरांजली स्वरभास्कराला या कार्यक्रमाला पुण्यातील नावाजलेल्या कलाकारांची साथसंगत लाभली. हार्मानियमवर संजय गोगटे तर व्हायोलिनवर सौ. चारुशीला गोसावी यांनी अभंगातील प्रत्येक जागा जशाच्या तशा लोकांपर्यंत पोहचविल्या. तबल्याची साथ वयाने सर्वात लहान असलेला विनित तिकोनकर यांनी फारच सुंदर केली. तसेच त्याचे वडील अविनाश तिकोनकर यांनी पखवाजवर समर्पक साथ करून मैफलीची रंगत वाढवित ठेवली. पंडीतजींबरोबर जवळपास प्रत्येक कार्यक्रमात टाळाची साथ करुन वाहवा मिळविणारे बुजुर्ग कलाकार माऊली टाकळकर यांचीही साथ या कर्यक्रमाला लाभली होती हे माठे भाग्यच म्हणायचे.

दोन-अडीच तास चाललेल्या कार्यक्रमाची सांगता पंडीतजींच्या जो भजे हरि को सदा या भजनाच्या ध्वनिमुद्रणाने झाली आणि पंडीतजींचा धीर गंभीर स्वर मनात साठवून रसिक तृप्त झाला.


Thursday, February 10, 2011

कलेची चव

ज्ञानी, महाज्ञानी,सर्वगुणसंपन्न असा समुदाय तुम्ही अनुभवलाय?

मी अनुभवलाय. एका शहरात.


खरे तर त्यांनीच मला त्यांची स्वत:ची ’ती अशी’ ओळख करवून दिलीय.जे लिहितोय ते स्वानुभवातुन लिहितोय.सांगोवांगी नाही.

या शहरातील लोकाना एक वेळ ’ढिल्ला’ महटले तर एवढा राग येणार नाही,पण जर कोणी ’अज्ञानी’ किंवा ’गावंढळ’ म्हटले तर त्यांच्या पचनीच पडत नाही. तिळपापड होतो.अंगाची अगदी लाही लाही होते.

इंटरनेट यायच्या आधी आणि आल्यानंतरही केवळ यांना आणि यांनाच सर्व जगाची माहिती असते वा असू शकते.भले यांच्या माहितीचा स्त्रोत केवळ दोनच वृत्तपत्रांशी निगडित असला तरी.

त्याचे कारणही आहे..’.गेला बाजार विद्यापीठातील ग्रंथालयात काम करणारा कोणीतरी सेवक त्यांचा दूरस्थ नातेवाईक असल्यामुळे जगातील सर्व ग्रंथ दोहो कर जोडून यांच्यापुढे सदैव उभे असतात,’असा भास वारंवार ते आपणा सर्वांना देत असतात.आणि हे अनुभवायला तुमच्या माझ्या सारखा नवखा त्यांच्यासमोर आला कि त्यांचा पतंग मस्त अवकाशात चंद्रापलिकडेही भरारी घ्यायला लागतो.

एखाद्या कवितेतील आशयाचा आनंद घेण्यापेक्षा त्यातील एका वेलांटीशी त्यांचा जीव खट्टू होवून अडकून राहतो.

मग ती कविता गेली उडत ,

जोपर्यंत ती वेलांटी यांच्या पठडीत बसत नाही तोपर्यंत यांचा जीव खालीवर होत राहतो.

यदाकदाचित यांच्या पोकळ ज्ञानघमेंडीचा तुम्हास कधी अनुभव आला तरी तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका.

केवळ तुमच्याशी नाही, तर सगळ्या जगाशीच या अशा अनेक विषयावरून त्यांचे कायम वाजत असते.



आपल्या नाकाशी किलोभर स्त्राव लोंबत असला तरी अमका ढमका कसा ’त्याच्या स्वप्नात चुकला’ यावर मार्निंग वाकला तासभर गुंतवून ठेवण्याचा अधिकार यांना दैवदत्त आहे.
आणि कमालीच्या इंटरेस्ट्ने तो वाजवत असतात.



त्यांच्या परखडपणा, स्पष्टवक्तेपणाचे तर क्या कहने?
’मी टरफले उचलणार नाही , मी शेंगा खाल्या नाहीत’ हे यांनी इतक्या वेळा घोकलेले आणि ओकलेले वाक्य असते कि
टिळक जिवंत असते तर त्यांनाही त्याचा अगदी वीट आला असता.
बरे टरफले मटारची आहेत आणि यांच्या तोंडात त्यातलाच मटार असला तरी...टरफले शब्द ऐकला कि त्यांचा ’असा परखडपणा’ बाहेर येणारच.मक्याच्या कणसाची पाने कुणी उचलायला सांगितले तर अर्धवट खालेल्ला बुट्टा तुमच्यासमोर नाचवून आधी शेंगांचा परखडपणा मांडतील.बरे टिळक रत्नागिरीचे..बाहेर गावचे.... तरीही यांचेच.


खरे तर , हे जरा उशीरा जन्माला आले अन्यथा सर्व संत मंहंत यांनी यांच्याच घरीच पाणी भरले असते.अधे मधे संत महंताच्या विविध परिक्षाही हे किंवा याचे सगे सोयरे उत्तीर्ण होत असतात.पढत मूर्खाची लक्षणे तर अगदी झोपेत सुद्धा पाठ म्हणून दाखवतील .पण जागे जाले की त्यातसुद्धा समर्थांनी थोडा बदल कसा करायला हवा होता, यावर तुमचा तास घेतील.

भारत तसा उत्सवप्रिय देश आहे,पण या मडळींची खासियतच काही विलक्षण आहे.ही मंडळी नुसती उत्सवप्रिय नाहीत तर,

ही मंडळी ’महोत्सवप्रिय’ आहेत.अनेक महोत्सव या शहरात बारा महिने चालू असतात.

या शहरात शिबिरे होत नाहीत. होतात फक्त महोत्सव.

...आरोग्य महोत्सव, तांदूळ महोत्सव, कोंबडी महोत्सव, बचत महोत्सव, गायन महोत्सव, वादनमहोत्सव, पैठणी महोत्सव, ह्रुदय महोत्सव.

अन न चूकता ही मंडळी प्रत्येक महोत्सवास मोठ्या संख्येने हजेरी लावतात.

भले मग मागच्या स्टालवर शाबूदाणा वडा झोडण्यात ’ गिरिजादेवी’ ऐकणे सुटले तरी हे त्यांच्या गावीही नसते.
खरे तर ते त्याची तमाच करीत नाहीत.कारण ’यांची मैफिल’, ’ हे’ बसल्यावरच सुरु होते अन ”हे’ उठले की तत्क्षणी संपते.

अकबर बादशाहा किंवा विक्रमादित्य हे तर ते स्वत:स समजतातच.पण त्याचबरोबर, ’मागणी तसा पुरवठा’ या तत्वानुसार on demand दरबारातील नवरत्नांचा रोलही एकेक करून ते आरामात निभावतात.
खरे तर त्याच्या कडे ९०० रत्नांची क्षमता आहे पण पुरेशा रसिक गणसंख्ये अभावी ते आवरते घेतात.
अथवा त्यांना असेही वाटते कि आपले गुण समजणे हे इतरांच्या आवाक्याच्या पलिकडचे आहे त्यामुळे आपणच पामर जनतेस सांभाळून घेणे भाग आहे.

ही माणसे चरितार्थासाठी किरकोळ कामेही करतात.पण त्यांच्या आवडीचे काम विचाराल तर ’दुस-यास कमी लेखणे’.

त्याच्या दुर्दैवाने अशा पद्धतीची नोकरी कोठे उपलब्ध नसल्यामुळे त्याबाबतीत ते विनामोबदला स्वयंरोजगाराचे तत्व अवलंबतात.

इतरांना त्यांची किंमत नसली तरी त्याची त्यांना फिकिर नसते.


मुकेश अंबानी या महाशयांकडे येत नाहीत, कारण ’ हे’ मुकेशला आपल्या घरी आमंत्रण देऊन बोलावत नाहीत म्हणूनच.

”तो तर केव्हाचा तयार बसलाय स्टार्टर मारून ’ अशी यांची धारणा.आणि समजा मुकेशदादा चुकून माकून कोठे यांना सापडलेच तर तुम्हास पेस्केल ( पगार ) आणि इन्क्रीमेंट किती? असे विचारण्याचे धारिष्ट्य यांच्या ठाई ठाई भरलेले आहे. यांच्या परवानगीशिवाय चालू असलेल्या इतर जगातील कोणत्याच कामाची यांना किंमत/पत्रास नसते.

यांच्या प्रत्येक गल्लीत ’आखिल भारतीय अबक मंड्ले’ असतात, ज्याची इतरत्र कोठेच शाखा नसते.
हे सगळे वाचल्यावर ज्यांना राग येणार आहे ती ”ही’ genuine माणसे नव्हेतच.
कारण सरळ आहे.
अनुल्लेखाने मारणे हाच यांचा साधा बाण आणि ब्रह्मास्त्र देखील..त्यामुळे इतरांनी उगीच यांचा पुळका घेऊ नये.

या नोट्मध्ये ब-याच शुद्धलेखनाचाच्या चुका जाणून बुजून करून ठेवलेल्या आहेत.

बाकी याच शहरात तासन्तास अभ्यास करणारी, सगळ्यांशी आपुलकीने वागणारी, प्रचंड सामाजिक कार्य करणारी अशी असंख्य व्यक्तीमत्वे माझे मित्र आहेत आणि मला त्यांच्याबद्दल आदरच आहे.अन तेही माझे मत जाणतातच.


पण फुकट रूबाब मारणा-यांबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे.
मित्रांनो यांच्या वागण्याचा ’त्रास आहे’ असे समजू नका.एक ’वैशिष्ट्यपूर्ण करमणूक’ देण्याचा मक्ता यांच्याकडे आहे ,
त्याचा आदर करा.
मला त्यांच्या कलेची चव समजायला जरा वेळ लागला.

तसा वेळ आपणापैकी कोणास लागू नये म्हणून हा पत्रप्रपंच
( हाही त्यांचाच लाडका शब्द बरका )

by

Shriniwas Deshpande

Tuesday, February 8, 2011

कुसुमांजली महोत्सव पुण्याला




नाटकांमधील प्रसंग सादर करण्यासाठी

थर्ड बेल एंटरटेन्मेंट प्रस्तुत "रंगोत्सव" - कुसुमांजली या महोत्सवाचे आयोजन पुण्याला केले आहे..

दि. २६ व २७ फेब्रु. २०११, बालगंधर्व रंग मंदीर येथे हा महोत्सव पार पडेल्.
दि. २७ फेब्रु. २०११ रोजी कुसुमाग्रजांच्या नाटकांमधील प्रसंग सादर होणार आहेत्.
यामध्ये कुसुमाग्रजांच्या नाटकांमधील प्रसंग सादर करण्यासाठी आपल्यापैकी कुठला ग्रुप इछुक आहे का?
असल्यास लवकरात लवकर संपर्क करावा.

नाटकांमधील प्रसंग १५ ते २० मिनीटांचा असला तरी चालेल्. उत्तम दिग्दर्शकांद्वारे व अभिनेत्यांद्वारे त्याचे परिक्षण केले जाईल व त्यानुसार उत्तम अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक् व प्रसंग अशी बक्षीसे देण्यात येतील व त्याचबरोबर प्रत्येक ग्रुप ला सहभागास्तव सन्मानचिन्ह देण्यात येईल्.

Swapnil Raste
9822426254

संपादकांची जीभ कापली गेलीय...



‘अदृष्ट तरीही सत्य गोष्टींच्या भासाने कलावंत लौकिक चौकटीच्या पार जाण्याची धडपड करीत असतात
आणि इथेच त्यांच्या लौलिक अपयशाची आणि अध्यात्मिक आनंदाची सुरुवात होते.
यातून जाताना अवघे आयुष्य होरपळ होऊन जाते. जीवनसत्य प्रस्थापित करण्याऐवजी भाववून घेण्याची
ही धडपड कलावंताला दैवी असमाधान मिळवून देते. यातूनही ते जीवनसत्य शब्दांतून प्रकट करताना होणारा आटापिटा,
त्यात वारंवार येणारे अपयश यांतून कलावंतांची घडण होत जाते.
हे सगळे स्वीकारत गेले तरच कवी हा कवी होतो.
यापासून पळ काढणारा नुसताच पद्यकार म्हणून उरतो. हे इमान कसोशीने सांभाळता आले पाहिजे.
दिसामासाने ओटीपोटात वाढणारी आग आनंदाने जपली-जोपासली पाहिजे.
मला हे कितपत जमले आहे याचे उत्तर माझ्यापाशी नाही...

– गुरुनाथ धुरी
----------------------------------------------------------------


( विद्यमान पत्रकारितेवरचं एका कवीचं भाष्य आहे हे.वाचकांचं दुःख आणि खऱया पत्रकारांची खंत याहून वेगळी नसावी.)

1.

संपादकांची जीभ

कापली गेलीय

त्यांच्याच दाताखाली.

बोलता येत नाहीय बिचाऱयांना



...गाऱहाणी लिहिलेल्या जिभा

तळहातावर घेऊन लोक

रांगेत उभे

संपादकांचे क्षेम याचित



ः देश असा मुकाट नव्हता झाला कधी. बिच्चारा.



2.

किती उलथापालथी, विध्वंस

वृत्तपत्रभर

तरी दचकत नाही एकही शब्द.



3.

प्रत्येक अफवेची

होऊ शकत नाही

बातमी,



प्रत्येक बातमी मात्र

...असते स्वतःहून

उच्च दर्जाची अफवा.



4.

कवितेतील बातमी

मावत नाही कधीच

वृत्तपत्राच्या आख्ख्या पानात



(घटकापळाने-संतोष शेणई)



.


.

Monday, February 7, 2011

माझ्या स्मृति-सागरात


खरतरं नटसम्राट बालगंधर्व आपल्याला मायबाप म्हणत आणि आपण मायबाप आहात असंच आपल्याशी वागत. आपले लाड त्यांनी जेवढे पुरवले तेवढे अन्य कोणत्याही रंगकर्मीनं पुरवले नसतील. तत्कालीन नाट्यगृहामध्ये येणा-या प्रेक्षकांसाठी उच्च प्रतीचा महागडा उद आणि लोबाण वापरून सबंध वातावरण त्यांनी प्रसन्न केलं. आनंदराव आणि बावूराव पेंटरसारख्या विख्यात चित्रकारांकडून पडदे रंगवून घेऊन आपणासमोर श्रीमंतीची आरास मांडली. रंगमंचावरील हिरव्या चादरीवर, बादशाही इराणी गालिचे पसरून श्रीमंतीची आरास अधिक खुलवली. नाटकातील पात्रांच्या अंगावर झुळझुळीत आणि वस्त्र वापरून रजवाड्यांच्या शौक कसा असतो, याचं दर्शन घडवलं. मुकुटावर आणि आभूषणांवर ख-या सोन्याचा मुलामा चढवला. वर कळस म्हणून देवदुर्लभ गायनानं , ज्याने आपले कान तृप्त केले, त्यांचं स्मरण करून आम्ही रंगमंचावर वावरलो. आम्हीही आपल्याला मायबापच म्हणतो, पण आई वडिलांचं कोडकौतुक करण्याऎवजी आम्ही आपल्याकडून लाड करून घेतले . नटहट्ट पुरे करून घेतले. क्वचित तुमचा उपमर्दही केला. त्या सर्वांची स्मरणकहाणी म्हणजे हे माझे आठवणीतले मोती.

दर आठवड्याला मी माझ्या स्मृति-सागरात बुडी मारून, आपणासाठी एक मोती घेऊन येणार आहे. हा मोती बोरा एवढा टपोरा असेल, जोंधळ्याएवढा बारीकही असेल, गरगरीत गोल असेल, तर ओबड-धोबडही असेल. मोतियाच्या रंगाचा तेजस्वी असेल किंवा कळा गमवलेला तेजहीन असेल. पण असेल तो अस्सल मोतीच.

आयुष्याची उणी-पुरी साठ पासष्ट वर्ष मी रंगभुमीवरच वावरलो. अगदी प्रमुख भूमिकेपासून तो रंगमंचामागील कामगारापर्यंत सर्व भूमिका वठवल्या. क्वचित ठेचकाळलो, पडलो, रक्तबंबाळही झालो. पण, पुन्हा उठून चालू लागलो आणि रसिका, हे सारं आपल्या डोळ्यासमोरच घडलं, या सर्व प्रदीर्घ वाटचालीत अनेक मोठ्या माणसांचं बोट धरून मी चाललो. अनेक लहानांना बोटाला धरून चालविलं. ही सर्व लहान-थोर माणसं या लेखमालेच्या निमित्तानं मला खुणावताहेत, मला स्पर्श कर म्हणाताहेत. अनेक ब-या-वाईट घटना माझ्या भोवती फेर धरून नाचताहेत. या सगळ्याचं शब्दांकन करण्याचा माझा हा प्रामणिक प्रयत्न, गोड मानून घे एवढीच रसिका, तुझ्या चरणी प्रार्थना.

कोणाबद्दल कडू-वाईट मी लिहिणार नाही अशी माझी प्रतिज्ञा आहे. या सर्व गोष्टींच्या पल्याड मी गेलो आहे. आता ’पैल तीरी काऊ कोकताहे’ अशी माझी अवस्था आहे. पण तरीही मी माणूस आहे, स्खलनशील आहे. माझ्याकडून, प्रसंगी काही कोणाबद्दल कडू-गोड लिहिलं गेलं तर आपण मला क्षमा करालच. पण त्यांनीही मला क्षमा करावी अशी विनंती. एक मात्र नक्की, की आपल्या रंजनासाठी आम्ही ’लटके ना बोलू, सांगू वर्तमान खोटे’. जे असेल ते खरं असेल, तो योगायोग किंवा काल्पनिक आहे असं कोणी समजू नये!

आता पुढच्या आठवड्यात मी माझ्या आठवणीतील पहिला मोती आपणास अर्पण करण्यासाठी येणार आहे. असाच मी वर्षभर येणार आहे. आपणास ह्या मोत्याचा चारा भरवण्याचं श्रेय अर्थातच चाफ़ा.कॉमकडे आहे. मोत्याची झळाळी आणि चाफ़ाचा सुगंध लेवून आता ही मालिका अखंडित चालू रहावी अशी आपण माझ्यावतीनं त्या नियन्त्याकडे प्रार्थना कराल ना? करालच या विश्वासातला

आपला,
प्रभाकर पणशीकर

लेखनसहाय्य : अप्पा कुलकर्णी

http://chaphakar.blogspot.com/2010/05/blog-post_24.html

स्मरण गुरूंचे



गायन वादनाचार्य कै. पं. गजाननबुवा जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने स्वरबहार या संस्थेने व्हायोलिन वादनाची मैफल पुण्याच्या स्नेहसदनच्या दालनात शनिवारी ५ फेब्रुवारी २०११ला आयोजित केली होती. दरवर्षी आपल्या गुरुंच्या स्मरणार्थ पुण्याचे ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. भालचंद्र देव हा कार्यक्रम आयोजित करीत असतात.



कार्यक्रमाच्या पूर्वाधात अनेक वर्ष बबनराव हळदणकरांना साथ करणारे पुणे आकाशवाणीचे निवृत्त व्हायोलिनवादक आणि पं. डी.के.दातार यांचे शिष्य रत्नाकर गोखले यांचे वादन रंगले. प्रारंभी भिमपलास रागात विलंबित एकताल आणि द्रुत तीन ताल सादर केला. पं. गजानबुवांनी बांधलेली जयताश्री रागातली एक रचनाही सादर केली. शेवटी पं. भीमसेन जोशी यांचा अधिक देखणे हा अभंग सादर करून आपल्या सुरेल आणि गायकी पध्दतीने वादनाची सांगता केली. त्यांना तबल्यावर पं. सुरेश तळवलकरांचे शिष्य मयंक बेडेकर यांनी अतीशय समर्पक साथ केली.

उत्तरार्धात भालचंद्र देव ( पं. गजाननबुवा जोशी यांचे शिष्य) आणि सौ. चारूशीला गोसावी (भालचंद्र देवांची कन्या व शिष्या) यांच्या व्हायोलिन वादनाची जुगलबंदी रंगदार झाली. जुगलबंदीतून सादर केलेली मधुवंती रागातली रचना सुरेल तर होतीच पण ती तेवढीच बहारदारपणे या दोन कलावंतानी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. मधुवंतीनंतर सादर झालेला राग होता श्री. या श्री रागातली पं. गजाननबुवांची मध्यलय तीनतालातली रचना सादर करून भैरवीने मैफलीची सांगता झाली. त्यांना तबला साथ केली ती रविराज गोसावी (चारूशीला देव यांचे पुत्र) यांनी. त्यांच्या वादनकौशल्यावर खूष होऊन रसिकांनी टाळ्याची पावतीही दिली. उत्तरार्धानंतरच्या कार्यक्रमाचे आणि एकूणच मैफलीचे संचलन राजय गोसावी यांनी केले. या पितापुत्रींचे वारंवार कार्यक्रम होवोत हिच आमची इच्छा.

गुरूंचे स्मरण करताना आजोबा. भालचंद्र देव. कन्यका आणि शिष्या सौ. चारूशीला गोसावी. तबल्यावर नातू रविराज गोसावी आणि सूत्रे हाती होती ते जावई राजय गोसावी. असा हा नात्याचा सुरेख आणि सुरेल संगम स्नेहसदनाच्या मंचावर एकत्रित झाला.

Wednesday, February 2, 2011

हा गानप्रवास आता संपला


महाराष्ट्रात आणि देशभरात असं एखादंच शहर असेल की जिथं पंडित भीमसेन जोशी यांचे तानपुरे झंकारले नाहीत. ख्यालगायकीच्या या राजाने हिंदुस्तानी संगीत सर्वदूर पोहोचवलं. किराणा गायकीला लाभलेल्या या समाजमान्यतेचं आणि प्रतिष्ठेचं श्रेय निर्विवादपणे भीमसेन यांनाच द्यावं लागतं.

किराणा गायकीचा आपल्याला जवळून ज्ञात असलेला प्रवास खाँसाहेब, अब्दुल करीम खाँ, सवाई गंधर्व आणि पं. भीमसेन जोशी असा आहे. संगीतातील परंपरांचे प्रवासही पाहण्यासारखे असतात. खाँसाहेबांचा आवाज अप्रतिम सुरेल होता; पण त्यांच्या गाण्यात बोलतान नव्हती. त्यांच्या सुरेल आलापीला रसात्मकता होती. सवाई गंधर्व तर त्यांचेच शिष्य! त्यामुळे त्यांची छाप भीमसेनांच्या गाण्यावर पुरेपूर होती. विशेषत: स्वर लावण्याची भीमसेनांची पद्धत थेट गुरुजींसारखीच! अर्थात भीमसेनांचं गाणं खूप बदललं. किराणाची वैशिष्टय़ं तिच्यात होतीच शिवाय दीर्घकाळच्या अभ्यास- चिंतनातून आणखीही बरेच त्यांनी साध्य केलं. किराणाची गायकी मुख्यत: तंत अंगाची आहे. गायकी स्वरप्रधान असली तरी आवाज लावण्याची या घराण्याची पद्धत अन्य घराण्यांपेक्षा काहीशी वेगळी आहे. ती गळ्यावर ताण देणारी आणि थोडी कृत्रिम आहे असं टीकाकारांना वाटतं. हा उणेपणा, तंत्रदोष असला तरी तिचे नाते ‘गोबरहारी बाणी’शी आहे. कारण आर्तता आणि भक्तिभाव हे तर या वाणीचे विशेष. भीमसेनांच्या आलापीत हे भाव किती उत्कटतेनं प्रकट होतात! स्वरांची आस अखंड टिकणे आणि एका स्वरातून दुसरा स्वर निर्माण होणे हे तंत अंगाचे अविभाज्य विशेष मानले जातात. भीमसेनांच्या प्रत्येक मैफलीत या वैशिष्टय़ांचा प्रत्यय पुरेपूर येतो. आकारयुक्त आलापी ही किराणाची खासियत नव्हे. बंदिशीतील किंवा चिजेतील मुखडय़ाच्या अंगाने जाणारी आलापी किराणात केली जाते. भीमसेनांच्या आकारयुक्त आलापीत हे दोन्ही गुणविशेष आढळतात. त्याबाबतीत केसरबाईंचा प्रभाव ते स्वत: मान्य करत. एकेक स्वर वाढवून रागाचा विस्तार करण्याची पद्धत किराणा घराण्यात आहे. गंधारापर्यंत या पद्धतीने स्वरविस्तार करून एक भारदस्त परिणाम साधला जातो. वेगवेगळ्या स्वराकृतीतून रागाची प्रतिमा उभी राहाते. त्याचीच छाया मैफलीवर पसरते. आसदार स्वर आणि स्वरांवरील ठहराव यातून गाणं रंजक कसं करायचं याची हातोटी भीमसेनांना साधली. सवाई गंधर्वाकडे शिकत असताना यातले काही बारकावे समजले. त्यातूनच मैफल जिंकण्याचा मंत्रही त्यांना अवगत झाला.

हिंदुस्तानी संगीताच्या गेल्या शंभर- सव्वाशे वर्षाच्या इतिहासात अल्लादिया खाँ, भास्करबुवा बखले, वझेबुवा, अब्दुल करीम खाँ, फैयाज खाँ आणि मंजी खाँ यासारख्या मातब्बर गवयांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केलं. प्रत्येकाच्या आवाजाची जात वेगळी. गाण्याचा ढंग वेगळा आणि ज्याचं त्याचं सामर्थ्यही भिन्न गुणावर आधारित होतं. या परंपरेतच भीमसेनांचं स्वत:चं स्थान होतं आणि आहे. ते त्यांनी त्यांच्या आवाजानेच निर्माण केलं. त्यांचा आवाज अस्सल पुरुषी- मर्दानी होता. आवाज आणि स्वर या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. आवाज हे साधन आणि स्वर हे माध्यम आहे याची जाणीव त्यांना होती. त्यांचा आवाज निसर्गदत्त गोड नव्हता. विशिष्ट त-हेच्या मेहनतीनं त्यांनी तो घडवला होता. त्या आवाजातून प्रकटणा-या स्वरांची किमया अद्भूत आहे. उत्तम जुळलेल्या तंबो-याच्या स्वरांच्या पार्श्वभूमीवर भीमसेनांनी पहिला आकारातला षड्ज लावला की सहजपणे श्रोते ‘व्वा!’ असा उद्गार काढत. आवाजाची झेप आणि स्वरांची फेक मोठी जबरदस्त होती. त्यांना दमसास स्तिमित करत असे. मर्दानी आवाजात मार्दवही होते. स्वराची आस आणि षड्जाशी असणारं नातं यामुळे ते श्रोत्यांना खिळवू ठेवत. आलापी केवळ आकाराची नाही. नुसत्या आकाराने रुक्षता येऊ शकते. स्वरात गोलाई आणि सच्चाई हवी. ती पुरेपूर होती. संथ, संयमित, भारदस्त आलापीतून रागविस्तार करत गाण्याचा उत्कर्ष कसा साधायचा याचं मर्म त्यांना हिराबागेतल्या पहिल्या मैफलीपासून साधलं होत. त्यांची मैफल रंगली नाही असं सहसा घडलं नाही.

केसरबाईंची आकारयुक्त आलापी आणि अमीरखाँची उत्तुंग तान भीमसेनांनी आपल्या गायकीशी एकरूप केली होती. चारी अंगांनी फुलत जाणारी आलापी आणि तानांचे अलंकरण यांचा आकृतीबंध त्यांच्या कोणत्याही मैफलीत प्रत्ययाला येई. प्रदीर्घ तानांच्या सरी म्हणजे स्वरवर्षावच! म्हणून भीमसेनांची अशी अनेक गुणांनी नटलेली मैफल हा श्रवणसुखाचा अत्युच्च आनंद देणारा अनुभव ठरायची.

मैफल कोणतीही असो, तंबो-यांच्या मध्यभागी भीमसेनांची सावळी मूर्ती गायला बसली की, पहिल्या षड्जातच मैफल काबीज व्हायची आक्रमक ढंगाची, काहीशी विरश्रीयुक्त गायकी म्हणता म्हणता रंग जमवू लागे.

भीमसेन मैफलीत काय गाणार अशी कुतूहलजन्य उत्सुकता त्यांच्या श्रोत्यांना सहसा नसे, कारण ते ठराविकच राग गात. अनवट राग गाण्याकडे त्यांचा कल नसे. याबद्दल त्यांच्यावर घेण्यात येणारे आक्षेप त्यांनी कधी नाकारले नाहीत. उलट ते याचे सार्थ स्पष्टीकरण देखील करत. प्रत्येक गायकीचे मैफलीचे, गळ्यावर चढलेले राग ठराविकच असतात. प्रचलित, आम रागांतील सौंदर्यच अधिक समर्थपणे दाखवता येतं असं त्यांना वाटे. भीमसेनांना सावनीपेक्षा बिहाग जवळचा वाटणं स्वाभाविक आहे. ‘कैसे सुख सोवे’ सारखी पारंपारिक बंदिश गाऊन भीमसेन सर्वागाने बिहाग राग साकारत.

तोडी, मियाँमल्हार, ललत, मुल्तानी, दरबारी, शुद्धकल्याण, अभोगी, मालकंस, मारुबिहाग, शुद्धसारंग, वृंदावनीसारंग हे पूर्वागप्रधान राग म्हणजे किराणा घराण्याचं राखीव क्षेत्र असं म्हटलं जायचं. त्यातही हे राग भीमसेनांकडूनच ऐकावेत असे वाटे. सकाळच्या मैफलीत तोडी, ललत, कोमल रिषभ आसावरी हेच राग ते सातत्याने गात पण त्याची गंमत वेगळीच असे. कोमल रिषभाची गडद छाया या गाण्यावर रेंगाळत राही. आजही तेच सूर कानात आहेत. सायंकाळच्या मैफलीतला पूरिया मारवा, मारवाश्री असो, किंवा रात्रीच्या मैफलीतला दरबारी, अभोगी, मियाँमल्हार, मालकंस, मारुबिहाग; ख्यालाच्या विस्तारानंतर तिन्ही सप्तकातील ताना सुरू झाल्या की सभागृह चैतन्यमय होऊन जात असे.

भीमसेनांनी ख्यालगायकी ख-या अर्थाने सर्वसामान्यांपर्यंत नेली. रागाचं शास्त्र कळलं नाही, बंदिश माहिती नसली तरी गाणं भावतं, भुलवतं! मैफलीत ज्या दर्जानं ते ख्याल पेश करायचे तेवढय़ाच ताकदीनं ठुमरी गायचे. ठुमरी गायनातील अभिजातता व सौंदर्य त्यांच्या गाण्यात होतं. जडणघडणीच्या काळात त्यांनी बुजुर्गाचं गाणं खूप ऐकलं होतं. त्यात बडे गुलामअली, सिद्धेश्वरीदेवी, बेगम अख्तर यांचाही समावेश होता. ठुमरीचे संस्कार त्यांच्यावर त्यातूनच झाले. कन्नड भाषक भीमसेन यांना ठुमरीचा अस्सल ढंग कसा उमगणार, याबद्दल काहींना शंका होती. ठुमरीचं लालित्य, नखरा आणि दर्द भीमसेनांची कोणतीही ठुमरी ऐकली तरी येईल.
स्वराकृतीबरोबर शब्दाकृतींनाही ठुमरीत स्थान असतं. शृंगाराबरोबर विरह, व्याकुळतेचं दर्शन भीमसेन कमालीच्या उत्कटतेनं घडवत. मिश्र काफीतली ‘पिया तो मानत नाही’ किंवा जोगियातील ‘पिया मीलन की आस’ ऐकताना भीमसेनांचं ठुमरीवरचं प्रभुत्वही प्रत्ययाला यायचं.

ख्यालगायकीच्या या राजाने भजनगायकीतही स्वतंत्र ठसा उमटवला. रागदारी मैफली एवढीच ‘संतवाणी’ची मैफल रंगे. आठ- दहा हजाराच्या समुदायाला खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य त्यांच्या भजनात आहे. ख्यालाएवढीच तल्लीनता भजनातही. भजन गायकी हा त्यांचा स्थायीभाव नव्हता. पुरंदरदास, जगन्नाथदासांची कन्नड भजनं, ब्रह्मानंदाची हिंदी भजनं व रामभाऊंकडून घेतलेले मराठी अभंग ते पूर्वी गात होते. ‘श्रीनिकेतना पालयमा’, ‘भाग्यदा लक्ष्मीवारगा’, ‘कायो करुणानिधे’, यासारखी कन्नड भजनं मराठी भाविकांनासुद्धा ठाऊक आहेत. ख्याल आणि ठुमरीबरोबरच भजन गाण्याची परंपरा किराणात आहे. भीमसेनांनी मात्र सांप्रदायिकांशी नाते जोडण्याचा प्रयत्न केला. वारकरी संप्रदायाची पठडी आणि भीमसेनांची ‘संतवाणी’ यात साम्य आणि भेदस्थळे बरीच असली तरी मराठी भाषक जनसामान्यांना भीमसेनांनी गायिलेले अभंग आपलेसे वाटतात. अभंग गायनातील लडिवाळ भावामुळे ही जवळीक साधली जात असावी.

प्रकृति अस्वास्थ्यामुळे बालगंधर्व आणि सवाई गंधर्व अखेरच्या काळात खासगी वा जाहीर मैफलींतून भजनं गाऊ लागले होते. पलुस्करांनी तर भजन हे संगीत प्रसाराचं साधन मानलं होतं. नारायणराव व्यास, ओंकारनाथ, द. वि. पलुस्कर यांच्या भजनाच्या ध्वनिमुद्रिका एके काळी लोकप्रिय होत्या. या पार्श्वभूमीवर भीमसेनांच्या ‘संतवाणी’चे वेगळेपण लक्षात येते.‘संतवाणी’चा कार्यक्रम म्हणजे ‘भागवत धर्माचं स्वरचित्र’च ठरे. भीमसेन मैफलीत भैरवी म्हणून भजनं गात होते. ‘जो भजे हरिको सदा’ किंवा ‘कायो करुणानिधे’, ‘अगा वैकुंठीच्या राया’ ही उदाहरणं बोलकी आहेत. ‘गुळाचा गणपती’ या पु.लं.च्या चित्रपटातलं, गदिमांचं ‘इंद्रायणी काठी’ हे गीत भजनासारखंच लोकप्रिय झालं.

1968 ते 1972 या काळात भीमसेन पुणे आकाशवाणीवरच अभंग गात होते. राम फाटक यांनी चाली दिलेले अभंग म्हणजे भीमसेनांचे भजनगायकीचं एक नवं उत्कट रूप ठरलं. ‘अधिक देखणे तरी निरंजन पाहणे’ पुणे केंद्रावरून प्रसारित झालं आणि हळूहळू ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम यांसारख्या संताच्या रचना भीमसेनांच्या आर्त स्वरांमुळे श्रोत्यांच्या ओठी येऊ लागल्या. राम फाटकांचं आणि भीमसेनांचं छान जमलं. आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या अभंगांच्या एच. एम. व्ही.नं ध्वनिमुद्रिका आणि ध्वनिफिती काढल्या आणि त्यातूनच 1972 मध्ये ‘संतवाणी’चा कार्यक्रम आकाराला आला. पुण्या- मुंबईतल्या वातानुकूलित सभागृहापासून ते आळंदी- पंढरपूरच्या देवस्थानासमोरील उघडय़ा पटांगणापर्यंत ‘संतवाणी’चे कार्यक्रम रंगू लागले. भीमसेनांच्या अभंगगायनात ही तन्मयता आली कोठून? बहुधा आध्यात्मिकतेचा हा धागा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच असावा. अभंग गायनातील प्रासादिकता त्यांनी आपल्या गुरुजींकडून घेतली असावी. सवाई गंधर्व ‘रामरंगी रंगले मन’ किंवा ‘कान्होबा तुझी घोंगडी’ अप्रतिम म्हणत. तीच उत्कटता भीमसेनांच्या गाण्यात प्रकटत असे. भीमसेन‘नामा म्हणे मज विठ्ठल सापडला’ ही ओळ म्हणतात, तेव्हा श्रोत्यांनाच विठ्ठलभेटीचा प्रत्यय येतो. ‘अणुरणिया थोकडा,तुका आकाशाएवढा’ म्हणताना तुकारामाच्या काव्यातील व्यापकतेचा अनुभव येतो. ‘विठ्ठल गीती गावा’, ‘कसा मला टाकून गेला राम’, ‘राजस सुकुमार’ या रचना मुद्दाम ऐकायला हव्यात. त्यातील काही ओळींची पुन्हा येणारी आवर्तने श्रोत्यांना डोलायला लावतात.
ख्याल, ठुमरी नाटय़गीत आणि भजन गाणा-या भीमसेनांनी नवे राग बंदिशी रचल्या, चित्रपटातून पार्श्वगायन केले. गोपालकृष्ण भोबे यांच्या ‘धन्य ते गायनी कळा’ नाटकाला संगीत दिले. अर्थात नवे राग बांधणं व चिजा रचणे हा त्यांचा स्वभाव नव्हता, ती त्यांची वृत्ती नव्हती; पण ललतभटियार, हिंदोलललत, कलाश्री यासारखी रागरूपं ही भीमसेनांचीच निर्मिती आहे. या रागातल्या चिजा आता मैफलीतून परिचयाच्या झाल्या आहेत. ‘कलाश्री’ मधील सरगम अनोखी आहे.‘ख्यालगायकीच्या राजा’चा हा गानप्रवास आता संपला आहे.

प्रसन्नकुमार अकलूजकर



http://www.prahaar.in/collag/36329.html