Monday, January 17, 2011

प्रचारमाध्यम ते व्यापारमाध्यम!


विचार करण्याचा लोकांचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, हे ‘दूरदर्शन’नं लक्षात ठेवण्याची गरज होती; तसंच सद्विवेक आणि तारतम्य याचं प्रक्षेपण उपग्रह करू शकत नाही, हे आता लोकांनी लक्षात घ्यावं.. उपग्रह चित्रवाणीच्या आगमनानंतर करमणूक, नीतिमत्ता याबद्दलच्या संकल्पना, सांस्कृतिक व्यवहार पालटत गेले. सांस्कृतिक परिवर्तनाचं स्वागत करायला हवं हे खरं; पण हे परिवर्तन कोणी घडवून आणायचं? आपण की कंपन्यांनी?

उपग्रहामार्फत प्रक्षेपण आणि शंभर चॅनल हाताळण्यासाठी रिमोट कंट्रोल उपलब्ध झाल्यापासून आपल्या घरातल्या टीव्हीला आज कॅलिडोस्कोपचं स्वरूप प्राप्त झालं आहे. टीव्हीला जगाची खिडकी वगरे म्हटलं जातं. पण या खिडकीतून सगळं जग काही दिसत नाही. टीव्हीवाले त्यांना अभिप्रेत असलेलं जे काही दाखवतात त्यालाच आपण जग म्हणायचं. त्यांनी कोणतं जग बघायचं हे देखील ते स्व:त ठरवत नाहीत. ते टीआरपी ठरवतो.


उपग्रह प्रक्षेपण सुरू होण्यापूर्वीचं टीव्हीजगत वेगळं होतं. टीव्हीवर काम करणाऱ्या आम्हा सर्व निर्मात्यांची चंगळ होती. आम्ही दाखवू ते कार्यक्रम पाहिले जायचे. निर्मात्यांपैकी फार थोडय़ांना टीव्ही या दृश्य माध्यमाची नस समजली होती. थोरामोठय़ांना टीव्हीवर बोलवायचं. स्टुडिओत तक्के-लोड मांडायचे आणि त्यांच्या मुलाखती घ्यायच्या अशा स्वरूपाचे बहुतेक सारे कार्यक्रम टीव्ही कार्यक्रम म्हणून खपवले जात. आपला प्रेक्षकही दूरचित्रवाणी माध्यमाच्या ताकदीबद्दल, या आधुनिक माध्यमाच्या सामर्थ्यांबद्दल अनभिज्ञ होता. घरी बसून स्टुडिओत गाणारा कलाकार दिसतोय यानंच तो हरखून गेलेला. स्टुडिओत खुर्च्या टाकून केलेला प्रतिभा आणि प्रतिमा हा मुलाखतवजा कार्यक्रम तेव्हा मुंबई दूरदर्शनवरला सर्वात रसिकप्रिय समजला जायचा. घरातल्या घरात बसून पु.ल. बोलताना पाहायला मिळताहेत; गावस्करचे चौकार पाहायला मिळताहेत हे प्रेक्षकांच्या द्दष्टीनं अपूर्व होतं.


कार्यक्रमाच्या आखणीत कार्यक्रम दृश्यात्मकपणे कसा सादर केला जावा; यावर फार कमी बोललं जायचं. आपण कलाकारांना स्टुडिओत बोलवायचं; सादरीकरणाचं कॅमेरामन आणि इतर तंत्रज्ञ काय ते बघून घेतील असा निर्मितीचा खाक्या होता. तुलनेला आसमंतात दुसरा चॅनल नसल्यानं निर्मात्यांच्या अल्पसंतुष्टतेला उधाण आलं होतं. कार्यक्रमात शहर फारसं दिसायचंच नाही. कॅमेरे केंद्राबाहेर काढायचे ते मंत्र्यांचे दौरे चित्रित करण्यासाठी, कामगार विश्व कार्यक्रमात कामगार नाहीत; चाळी, गल्ल्या, गिरण्या या कामगारविश्वाचं दर्शन नाही. शेती-विषयक कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या जीवनशैलीचं चित्रण नाही. शेतकरी हा माणूस आहे. त्याला पिकांच्या आरोग्याइतकी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते. त्याला करमणूक हवी असते; शेतकऱ्यांत चित्रकार, गीतकार, गायक, नकलाकार असू शकतात. याचंही दर्शन शेतक-यांच्या कार्यक्रमातून घडायला हवं असं कोणाला वाटत नसे. युवकांच्या कार्यक्रमात युवक दिसले तर ते स्टुडिओत चर्चा करताना. कॉलेजच्या आवारात नाही. आमची पंचविशी नावाचा कार्यक्रम युवदर्शनमध्ये असायचा, त्यात पन्नाशी-साठीचे लोक भाग घ्यायचे आणि आपल्या कॉलेजातल्या दिवसाविषयी बोलायचे. सर्वात अधिक लोकप्रिय कार्यक्रम छायागीत होता, ज्यात दूरदर्शनचं योगदान शून्य होतं.


वृत्तपत्रांतून कार्यक्रमांच्या दर्जावर हल्ला होई. चित्रीकरणासाठी पुरेशा सोयी सुविधा नाहीत. कॅमेऱ्यांची संख्या पुरेशी नाही अशी ठरीव कारणं पत्रकारांसमोर फेकली जात. ही सबब पूर्णाशानं खरी नव्हती. जी काही साधनसामग्री होती ती पुरेशा कल्पकतेनं वापरली जातेय का हा खरा प्रश्न होता. बातम्यांचं चित्रण करण्यासाठी बाह्यचित्रणाचे कॅमेरे वापरले जात. हे कॅमेरे नेमके काय प्रकारच्या घटना चित्रित करत हे पाहाण्यासारखं असायचं. बडय़ा कंपन्यांच्या वार्षकि सर्वसाधारण सभा, राजभवनात आलेली शिष्टमंडळं वा राज्यपालांच्या हस्ते होणारे शुभारंभ अशा किरकोळ प्रसंगांचं चित्रण बातम्या म्हणून केलं जाई. पंतप्रधान, राष्ट्रपती समारंभानिमित्त शहरात आले की, ते परतेपर्यंतच्या सगळ्या हालचाली टिपण्यासाठी दूरदर्शनचे कॅमेरे त्यांच्या मागं धावत. मंत्रालयातल्या लहानसहान बैठका. मुख्यमंत्र्यांना भेटायला येणारी शिष्टमंडळं यासाठी एक-दोन कॅमेरे मंत्रालय परिसरात घुटमळत.


उपलब्ध तांत्रिक सामग्री सरकारच्या दावणीला बांधल्यावर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी काय शिल्लक राहणार? एखाद्या नाटकासाठी बाह्यचित्रण करता आलं तर निर्माता आपण खूप सर्जनशील काम केल्याच्या ऐटीत फिरे. गीतगायनाच्या कार्यक्रमात अधूनमधून निसर्गदृश्यं पेरणं हा सर्जनशीलतेचा कळस मानला जायचा.


नोकरशाहीची बैठक दूर ठेवून कार्यक्रमाच्या निवडीला आखणीला सांस्कृतिक प्रगल्भपणाची बैठक द्यायला हवी होती. माध्यमाच्या दृश्यप्रधान स्वभावाचा विचार कार्यक्रमाच्या सादरीकरणात असायला हवा होता. यातलं काहीच या नोकरशहांनी केलं नाही. माहिती आणि प्रसारण मंत्र्यांच्या आज्ञेबरहुकूम त्यांना काम करावं लागे. निर्माते संचालकांच्या दडपणाखाली; तर संचालक केंद्रीय मंत्र्यांच्या दबावाखाली. दूरदर्शनवरले रटाळ कार्यक्रम केवळ पर्याय नसल्यानं वा सवयीचा भाग म्हणून पाहिले जायचे. आजही ही स्थिती कायम आहे.

आणीबाणीच्या दरम्यान एका पत्रकारानं मला विचारलं होतं, तुमच्या केंद्रावर संघाच्या माणसांचा भरणा अधिक आहे हे खरं आहे काय? ही मंडळी सरकारी कामात हस्तक्षेप करून त्यांची धोरणं राबवतात का? मी म्हटलं, तुम्ही म्हणता तसा संघातल्या माणसांचा इथं भरणा आहे हे खरं आहे. पण इथं काम करताना ते सत्तारूढ पक्षाशी एकनिष्ठ राहून आपलं काम चोख बजावतात असं माझं निरीक्षण आहे.
तत्कालीन सरकारनं घाईघाईनं देशभर दूरदर्शन केंद्रं सुरू केली, ती टीव्हीसारखं परिणामकारक माध्यम आपल्या हाती राहावं म्हणून. या धोरणामुळे दूरदर्शनचा केवळ आडवा विस्तार होत गेला. ही केंद्रं नीटपणे चालावीत, त्यातून प्रेक्षणीय कार्यक्रमाची निर्मिती व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज सरकारला भासली नाही. सत्तर टक्के स्टाफ कंत्राटी पद्धतीनं निर्माण केला गेला. कंत्राट-कराराचं नूतनीकरण करणं हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाती असल्यानं त्या अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळणं ओघानं आलंच. ही एक प्रकारे सांस्कृतिक क्षेत्रातली वेठबिगारी होती. यातून एक अकलात्मक वातावरण या सरकारी टीव्ही वाहिनीत निर्माण झालं. टीव्हीवरले निर्माते, कॅमेरामन आणि इतर कलाकार पाहता पाहता व्हिडिओ कामगार बनून गेले. दूरदर्शनचं सांस्कृतिक स्थान आणि सामाजिक भूमिका लक्षात घेता तिथली कार्यपद्धती इतर सरकारी सेवा संस्थांहून भिन्न असायला हवी हे इथल्या प्रशासकांनी कधीच लक्षात घेतलं नाही. या प्रसारमाध्यमाचं प्रचारमाध्यमात रूपांतर करण्यासाठी जे जे करता येईल ते केलं.

आणीबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांचा गैरवापर झाला, हे खरं नाही. हा गरवापर दूरदर्शनच्या जन्मापासून सुरू झाला होता. आणीबाणीच्या काळात या वृत्तीचा अतिरेक झाला असं फार तर म्हणता येईल.
सरकारनं कितीही कायदे केले, बंदी घातली तरी लोकांच्या एका हक्काला कोणतंही सरकार धक्का लावू शकत नाही. तो म्हणजे विचार करण्याचा हक्क. दूरदर्शनवरल्या अधिकाऱ्यांना विचार-स्वातंत्र्य कधीच महत्त्वाचं वाटलं नाही. त्यांच्या कार्यक्रमांतून विचारस्वातंत्र्याच्या आविष्काराची धडपड कधी दिसली नाही.

उपग्रहामार्फत टीव्ही सिग्नल प्रक्षेपित करता येऊ लागले, आणि दूरदर्शनची ही शोकांतिका अधिक गडद झाली. कार्यक्रमाचा दर्जा वाढवण्यासाठी धोरणात लवचिकता आणणं गरजेचं होतं. पण हे घडलं नाही.
नियमाचा बागूलबुवा दाखवून गुणी कलावंतांना जाहीर प्रक्षेपणाची दारं बंद करणं; कमी प्रतीच्या कलावंतांना शासकीय अधिका-यांच्या, वरिष्ठांच्या दडपणापोटी किंवा व्यक्तिगत हितसंबंधासाठी पडद्यावर चमकायची संधी देणं या सा-याचे परिणाम कार्यक्रमाच्या दर्जावर होणार नाहीत असं कसं होईल?


उपग्रह प्रक्षेपणाआधी दूरदर्शन या सरकारी वाहिनीचं चित्र हे असं होतं. उपग्रह प्रक्षेपण, केबल टीव्ही या पाठोपाठ खाजगी कंपन्यांच्या वाहिन्या यांचं आगमन झालं. शहरी घराघरांत खासगी वाहिन्या पोहोचल्या. मक्तेदारीला आव्हान मिळाल्यामुळे दूरदर्शनला थोडी जाग आली. अधिक प्रायोजक मिळतील असे कार्यक्रम करा असे अलिखित आदेश निर्माते आणि अधिकाऱ्यांना मिळाले. मग खासगी टीव्हीवरल्या कार्यक्रमांच्या नकला सुरू झाल्या. त्यातही चांगल्या कार्यक्रमाऐवजी बुगीबुगीसारखे सवंग कार्यक्रम उचलले गेले. दम दमा दम यासारखे इथल्या कलासंस्कृतीशी विसंगत असे कार्यक्रम दूरदर्शनवर होऊ लागले. दर्जाकडे दुर्लक्ष करून नेपथ्याचा लखलखाट, झगमगीतपणाचं अनुकरण होऊ लागलं. नऊवारीतली स्त्री अचानक जीन्स घालून हिंडू लागावी तसं झालं.

केबल टीव्ही इथल्या आम जनतेला, खास करून खेडय़ातील गरीब जनतेला परवडण्यासारखी गोष्ट नव्हती; आजही नाही. त्यामुळे दूरदर्शन पाहाणाऱ्यांची संख्या आज खासगी वाहिन्यांच्या तुलनेनं जास्त आहे. या वास्तवाच्या जोरावर दूरदर्शनवाले अजूनही आपला चॅनल सर्वाधिक लोकप्रिय असल्याचा निष्कर्ष काढतात. पण हे स्वत:ला फसवणं आहे. सेन्सेक्सचे आकडे दाखवून देशातल्या गरिबीचं उच्चाटन झाल्याचा निष्कर्ष काढण्यासारखं आहे हे! नऊ कोटीच्या महाराष्ट्रात कार्यक्रमाची प्रशंसा करणारी वीस पत्रं आली की दूरदर्शनचा निर्माता हवेत तरंगायला लागतो. अशा वेळी हसावं की रडावं?
सांस्कृतिक क्षेत्राचं प्रशासन करण्यासाठी कला आणि साहित्याची आस्था आणि जाण असलेला संचालक लागतो. उपग्रहपूर्व काळात दूरदर्शन केंद्राला सुरुवातीला असे संचालक लाभले. उत्तमोत्तम कलाकारांनी या काळात दूरदर्शनवर हजेरी लावून आपली कला सादर केली. त्यांची जागा नंतर नोकरशहांनी घेतली आणि दूरदर्शनच्या आधीच्या पुण्याईवर पाणी फिरवले. उपग्रहापूर्वीच्या दूरदर्शनचं काहीसं काळंसावळं चित्र मी आपल्यापुढं मांडतो आहे याची मला कल्पना आहे.


दूरदर्शनवर चांगल्या निर्मिती झाल्या नाहीत; कलाक्षेत्रातलं दूरदर्शनचं योगदान शून्य आहे असा निष्कर्ष मात्र कृपया यातून कोणी काढू नये. राजकीय क्षेत्रात अपवादात्मक नेते आढळतात तसे सरकारी संस्थातही असतात. अनेक चांगले माहितीपट, चांगली नाटकं, चांगले गीत-गायनाचे, मुलाखतींचे कार्यक्रम दूरदर्शनवर झाले. पुढे काही खासगी वाहिन्यांनी या कलाक्षेत्रात सवंग, असांस्कृतिक िधगाणा घातला. तो पाहता दूरदर्शनची ही साधीशी कामगिरी आज खूप महत्त्वाची वाटू लागली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, अपुऱ्या साधनसामग्रीचा कल्पक वापर करून उत्तम कार्यक्रम निर्माण करण्याचा चमत्कार करून दाखवणारे काही निर्माते दूरदर्शनला सुरुवातीच्या काळात लाभले. त्यातल्या काही प्रयत्नांची झलक आज ‘पाऊलखुणा’ कार्यक्रमात पाहायला मिळते.


दूरदर्शनवरल्या आजच्या निर्मात्यांबद्दल, त्यांच्या निर्मितीबद्दल काय बोलावं? इतर वाहिन्यांवरले अवगुण तेवढे उचलायचे असं दूरदर्शननं ठरवलं आहे. व्यापारीकरणामुळे कल्पकता कोप-यात सारली गेली आहे. ज्या कार्यक्रमाला जास्त जाहिराती तो चांगला अशी नवी व्याख्या निर्माण झाल्यावर दुसरे काय होणार?


करमणुकीद्वारे शिक्षण असं उदात्त प्रयोजन बाळगून या देशात दूरचित्रवाणीचं प्रसारण सुरू झालं. आता करमणुकीद्वारे करमणूक असं चालू आहे. यातही गर काही नाही. पण करमणुकीचा बुद्धी आणि तारतम्याशी संबंध असतो याचं भान ना दूरदर्शनपाशी ना खासगी वाहिन्यांपाशी. उपग्रहामार्फत टीव्ही प्रक्षेपण देशभर पसरू लागलं आणि शहरातल्या टीव्हीचंच नव्हे तर संपूर्ण लोकजीवनाचं चित्र बदलून गेलं. हे एक सांस्कृतिक जागतिकीकरणच होतं. करमणूक, नीतिमत्ता याबद्दलच्या संकल्पना, कुटुंब व्यवस्थेतल्या रीतीभाती, माणसा माणसातले सांस्कृतिक व्यवहार सगळ्या गोष्टीत उलथापालथ घडून यायला सुरुवात झाली. उपग्रह कार्यक्रमांचं प्रक्षेपण करू शकतो. सद्विवेक आणि तारतम्य याचं प्रक्षेपण नाही करू शकत. आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी किती खालच्या पातळीवर उतरायचं हे आता इथल्या मिडिया-मॅनेजरना ठरवावं लागेल.

सांस्कृतिक परिवर्तनाचं स्वागत करायला हवं हे खरं आहे. पण हे परिवर्तन कोणी घडवून आणायचं? वॉिशग मशिन, मोटारींचे टायर्स, मोबाइल फोन, डिर्टजट साबण तयार करणाऱ्या कंपन्यांनी की आपण? आपणा प्रेक्षकांमधलेच काही पलीकडे जाऊन बसतात. कार्यक्रम निर्माते बनतात, हे वास्तव लक्षात घेतलं तर? तर काय .. जनतेला आपल्या लायकीचं सरकार मिळतं तसा आपल्या लायकीचा टीव्ही मिळतो असं म्हणायचं का?

अवधूत परळकर

http://www.prahaar.in/collag/index.1.html

No comments:

Post a Comment